Monday, April 29, 2024

/

रुक्मिणी नगर अद्याप दुर्लक्षितच.. स्थानिकांचा संताप

 belgaum

बेळगाव लाईव्ह : शहर स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत कामकाज करण्यात आले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून स्मार्ट सिटीची कामे सुरूच आहेत. मात्र शहराचा विकास करण्याच्या नावाखाली शहराचे विद्रुपीकरण तर झालेच आहे परंतु उपनगरांकडेही मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाल्याने उपनगरातील स्थानकातून संताप व्यक्त होत आहे. बेळगावमधील रुक्मिणीनगर येथील अवस्थाही अशीच आहे.

रुक्मिणी नगर भागातील नागरिक मूलभूत आणि पायाभूत सुविधांपासून वंचितच आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून या भागातील नागरिक विकासाची अपेक्षा ठेवून आहेत. निदान रस्त्यांचा विकास करून नागरिकांच्या दळणवळणाची सोय केली जावी, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत. मात्र आजतागायत या भागात विकासकामांचा बोजवारा उडाल्याचेच चित्र दिसून आले आहे. बेळगावमधील रुक्मिणीनगर मध्ये विकासाच्या नावावर समस्यांमध्ये भर घालण्यात आल्याचे चित्र सध्या दिसून येत असून विकासकामांसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांमुळे येथील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. काल झालेल्या वळिवाच्या पावसानंतर येथील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून ड्रेनेजचे सांडपाणी, अपूर्ण रस्त्यांच्या कामकाजामुळे चिखलाचे साम्राज्य या भागात पसरले आहे.

या भागात ड्रेनेज वाहिन्या घालण्याचे कामकाज हाती घेण्यात आले होते. मात्र या कामकाजासाठी रस्त्यांवर खोदकाम करण्यात आले आहे. तसेच सांडपाणी प्रकल्पासाठी पंप हाऊसची निर्मिती देखील करण्याचा प्रस्ताव या भागात आखण्यात आला असून या कामकाजादरम्यान रुक्मिणीनगर स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण उडाली आहे. ड्रेनेज वाहिन्या घालण्यात आल्यानंतर रस्त्याची डागडुजी करण्याकडे कंत्राटदाराचे साफ दुर्लक्ष झाले असून वळिवाच्या पावसामुळे खोदकाम करण्यात आलेल्या रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे या भागात याआधीही काही अपघात घडले असून पावसामुळे निर्माण झालेल्या चिखलसदृश्य रस्त्यामुळे अपघातांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.Rukmini nagar

 belgaum

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत महांतेश नगर, माळ मारुती परिसरात विकास कामे राबविण्यात प्राधान्य देण्यात आले आहे. मात्र, या परिसरात असलेल्या रुक्मिणी नगर स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्याकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले आहे. येथे निर्माण झालेल्या चिखलामुळे वाहने अडकून पडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.

वाहने घसरून वाहनधारकांना दुखापत देखील होण्याचे प्रकार वारंवार घडत असून या भागात विकासकामांसाठी खोदण्यात आलेल्या चरी तातडीने बुजविण्यात याव्यात, पावसाळा सुरु होण्यापूर्वी रस्त्याची डागडुजी करून नागरिकांची समस्या सोडवावी अशी मागणी रुक्मिणी नगर भागातील रहिवासी करत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.