बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील तोलगी येथे घरासमोरील सांडपाण्याच्या कारणावरून झालेल्या वादात ५४ वर्षीय व्यक्तीची कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी नंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तोलगी येथील रहिवासी अतीक अमीरसाब पाश्चापुरे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. आरोपी अशोक रामप्पा उगरखोड हा फिर्यादीच्या घराशेजारील मोकळ्या जागेत कुऱ्हाड घेऊन खोदकाम करत सांडपाणी सोडण्याचा प्रयत्न करत होता. यावरून फिर्यादीचे वडील अमीरसाब पाश्चापुरे आणि आरोपीमध्ये वाद सुरू झाला.
हा वाद वाढत गेल्यानंतर संतापलेल्या अशोकने आधी फिर्यादीच्या दिशेने कुऱ्हाड फेकली. त्यानंतर त्याने अमीरसाब यांना खाली पाडून त्यांच्या छातीवर कुऱ्हाडीने गंभीर वार केले. या हल्ल्यात अमीरसाब गंभीर जखमी झाले. तर इतर संशयित रेणुका उगरखोड आणि अश्विनी उगरखोड यांनी फिर्यादीला मारहाण केली.
जखमी अमीरसाब यांना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून बेळगाव जिल्हा रुग्णालयात नेत असताना वाटेतच इतरगी क्रॉस जवळ त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी नंदगड पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.





