बेळगाव लाईव्ह :कालच्या अवकाळी मुसळधार वळीव पावसामुळे गटारी तुंबून घाण -केरकचरा व सांडपाणी रस्त्यावर येण्याद्वारे दुर्गंधी पसरून फोर्ट रोडवरील ओव्हर ब्रिजला लागून असलेल्या सर्व्हिस रोडला आणि देशपांडे पेट्रोल पंप पासून भरतेश कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याला सध्या नरकाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या प्रकारामुळे येथील दुकानदार आणि व्यावसायिकांतून स्मार्ट सिटी लिमिटेड व महापालिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जुना पी. बी. रोड अर्थात फोर्ट रोड येथे कांही वर्षांपूर्वी ओव्हर ब्रिजची उभारणी करण्यात आली. या ब्रिजला लागूनच अनेक दुकाने व व्यवसाय असणारा लहान सर्व्हिस रोड आहे. ओव्हर ब्रिज झाल्यापासूनच या सर्व्हिस रोडवर गटार तुंबण्याची समस्या निर्माण होत असते. काल दुपारनंतर झालेल्या जोरदार पावसामुळे ही समस्या पुन्हा उद्भवली. पावसामुळे गटारी तुडुंब भरून या ठिकाणच्या दुकानांमध्ये घाण पाणी शिरल्याने दुकानदारांची तारांबळ उडाली होती.
इतकेच नाही सदर प्रकाराची आज शनिवारी सकाळपर्यंत महापालिकेने दखल न घेतल्यामुळे हा सर्व्हिस रोड काळ्याशार सांडपाण्याखाली जाण्याबरोबरच घाण पाणी, प्लास्टिक बाटल्या, कचरा भरलेल्या प्लास्टिक पिशव्या, जनावरांची हाडे आणि गाळाने व्यापला होता. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधीचे वातावरण पसरले होते. महापालिकेचे साफ दुर्लक्ष झाल्यामुळे येथील दुकानदार व व्यावसायिक आपल्यापरीने रस्त्यावर तुंबलेल्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी प्रयत्न करताना पाहावयास मिळत होते. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात सांडपाणी साचण्याबरोबरच सर्वत्र घाण दलदल व दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे काल सायंकाळपासून येथील दुकानदार व्यावसायिक आणि रहिवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून त्यांच्या तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या संदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना ओमकार नामक व्यावसायिक म्हणाला की, आमच्यासाठी हे नवीन नाही. अलीकडे दरवर्षी पावसाळ्यात ही समस्या निर्माण होत असते. बेळगाव स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत या सर्व्हिस रोडच्या ठिकाणी काहीच सुधारणा करण्यात आलेली नाही. हा रस्ता देखील व्यवस्थित नाही आणि येथील गटार देखील कायम तुंबलेली असते. त्यामुळे पावसाळ्यात तुंबलेली घाण आणि केरकचरा या पद्धतीने रस्त्यावर येऊन आम्हाला मनस्ताप सहन करावा लागतो.
महापालिकेचे सफाई कामगार या ठिकाणी येऊन रस्त्यावरील कचरा दररोज काढतात. मात्र आता सध्या पसरलेली ही घाण काढण्यासाठी अद्याप कोणीच आलेले नाही. त्यामुळे आम्ही दुकानदारच आमच्या कामगारांच्या मदतीने रस्त्यावरील ही घाण व कचरा काढून तुंबलेल्या सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करत आहोत. प्रत्येक वेळी आम्हाला हा मनस्ताप सहन करावा लागतो.
याखेरीज सर्वत्र घाण पसरली असल्यामुळे ग्राहक येत नाहीत, त्यामुळे आमच्या उद्योग, व्यवसायालाही फटका बसतो. तेंव्हा दरवर्षी पावसामुळे गटार तुंबून रस्त्याची दुर्दशा होण्याच्या या प्रकाराकडे स्थानिक नगरसेवक, आमदार आणि संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन ही समस्या कायमची निकालात निघेल अशी व्यवस्था करावी, अशी मागणी ओमकार यांनी केली.
सोशल मीडियावर या सांडपाण्याची बातमी प्रसिद्ध होताच महापालिका प्रशासन जागे झाले असून महापालिकेच्या वतीने रस्त्यावर आलेले सांडपाणी बाजूला करण्याचे प्रयत्न शनिवारी दुपारपर्यंत सुरू होते.