बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली उच्चाधिकार समितीची बैठक अपरिहार्य प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात आली आहे. ही बैठक मंगळवार, दिनांक ३० जून २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता मुंबईतील विधान भवन येथील मंत्रिमंडळ सभागृहात पार पडणार होती.
या बैठकीबाबत सामान्य प्रशासन विभागाने अधिकृत पत्रक प्रसिद्ध करून माहिती दिली आहे. नियोजित बैठक रद्द झाली असून या बैठकीची पुढील तारीख लवकरच स्वतंत्रपणे कळविण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सीमाप्रश्नावरील ही महत्त्वपूर्ण बैठक अचानक लांबणीवर पडल्यामुळे प्रदीर्घ काळापासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या सीमाभागातील नागरिकांमधून आणि समन्वय समितीकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राज्यसभा सदस्य शरद पवार, लोकसभा सदस्य नारायण राणे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह सीमाप्रश्नाचे समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई उपस्थित राहणार होते.
तसेच राज्य सरकारचे कायदेतज्ज्ञ, महाअधिवक्ता मिलिंद साठे आणि मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी या बैठकीला निमंत्रित होते. या महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन आता कधी केले जाणार, याकडे सीमावासीयांचे डोळे लागले आहेत.



