Friday, March 29, 2024

/

भाजपला सावरकरांची आत्ताच का आठवण? – माजी आम. कुडची

 belgaum

स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वातंत्र्य सेनानीच होते यात कोणतेच दुमत नाही असे स्पष्ट करून भाजपला इतके दिवस सावरकरांचा विसर पडला होता का? निवडणूक जवळ येत असताना यांना आत्ताच कसे वीर सावरकर आठवतात? असा सवाल बेळगावचे माजी आमदार रमेश कुडची यांनी आज केला.

श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात वीर सावरकरांची प्रतिमा लावण्याचा उपक्रम, वाढती महागाई, आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुका यासंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी बेळगाव लाईव्ह प्रतिनिधींनी आज शुक्रवारी सकाळी माजी आमदार रमेश कुडची यांची भेट घेतली असता ते बोलत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वातंत्र्य योद्धेच होते यात कोणतेच दुमत नाही. कर्नाटकातील काँग्रेस हाय कमांडच्या नेत्यांनी सावरकरांविरोधात भूमिका मांडल्या असतील. मात्र एखाद्या गोष्टीला सकारात्मक व नकारात्मक दोन्ही बाजू असतात हे ध्यानात घेतले पाहिजे असे सांगून भाजपला इतके दिवस सावरकरांचा विसर पडला होता का? नेमक्या निवडणुका जवळ येत असताना त्यांना आत्ताच सावरकर कसे आठवतात? असा सवाल कुडची यांनी केला.

वाढत्या महागाईबद्दल बोलताना अलीकडे जीएसटी कराचा मोठा गाजावाजा सुरू असला तरी काँग्रेसने सर्वप्रथम जीएसटी लागू करण्यास सुरुवात केली होती. मात्र ती काही ठराविक वस्तूंपूर्ती मर्यादित होती. जीएसटीचा सरकारला फायदा व्हावा आणि जनतेला ही त्रास होऊ नये याची दक्षता काँग्रेसने घेतली होती. त्यावेळी विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने जीएसटीला विरोध केला होता. मात्र तोच भाजप आता सत्तेवर आल्यानंतर दर 3 महिन्याला जीएसटी वाढ करत आहे. आज सर्वसामान्य नागरिकांना प्रत्येक जीवनावश्यक वस्तूसाठी जीएसटी कर भरावा लागत आहे असे स्पष्ट करून भाजप सरकारने आता जनतेच्या मलमूत्रावर जीएसटी लावण्याचे तेवढे बाकी ठेवले आहे. 2014 साली ‘बहोत हो गई महंगाई अबकी बार मोदी सरकार’ असा भाजपचा नारा होता. हाच नारा आता ‘बहोत हो गयी महंगाई अब की बार मोदी सरकार की हाहाकार’ या पद्धतीने म्हणण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी उपरोधाने सांगितले.

 belgaum

केंद्र सरकारने आधीच लागू केलेल्या करावर राज्य सरकार पुन्हा आपला कर लादत आहे. या पद्धतीने एकाच उत्पादनावर दुहेरी कर वसूल केला जात आहे. हा अन्याय प्रकार बंद झाला पाहिजे. देशातील 23 औद्योगिक क्षेत्रांचे मोदी सरकारने ज्या प्रकारे खाजगीकरण केले आहे. तसेच त्यांनी देशातील सर्व दुकानांचे देखील खाजगीकरण करावे म्हणजे अन्यायी कर भरण्यात पेक्षा दुकानदार खाजगीकरणातून मिळणारा 20 टक्के पैसा घेऊन किमान घरी निवांत बसून खाऊ तरी शकतील.Ramesh kudachi

बेळगाव शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील जनतेने आगामी 2023 -24 मध्ये होणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला मतदान करायची की नाही? याचा गांभीर्याने विचार करावा. जनतेला जर उज्वल भविष्य हवे असेल तर त्यांनी भाजपला कोणत्याही परिस्थितीत मतदान करू नये असे आपले स्पष्ट मत असल्याचे कुडची यांनी सांगितले.

काँग्रेसला बेळगाव जिल्ह्यात चांगले दिवस येणार का? या प्रश्नाला उत्तर देताना फक्त जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात काँग्रेसला लवकरच चांगले दिवस येणार हे निश्चित आहे. आम्ही म्हणतो म्हणून नाही तर सर्वेक्षणाअंती पूर्वी राज्यात काँग्रेसच्या 134 जागा येतील असा अंदाज होता, आता तो आकडा 144 हून अधिक झाला आहे. यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळूरला आले असून त्यांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. मंगळूरमध्ये मोदी मोठमोठी आश्वासने देतील. मात्र एकही पूर्ण करणार नाहीत. त्यांनी 2014 पासून आतापर्यंत जनतेला दिलेल्या आश्वासनांपैकी एका तरी आश्वासनाची पूर्तता केली आहे असे कोणीही मला दाखवून द्यावे. त्यासाठी मी राजकारण सोडायला तयार आहे, असे आव्हानही कुडची यांनी दिले. त्याचप्रमाणे कांही दिवसांपूर्वी शहरातील कॉलेज रोडवरील स्मार्ट सिटीच्या निकृष्ट व अवैज्ञानिक विकास कामावर आरोप करणाऱ्या काँग्रेसचे माजी आमदार रमेश कुडची यांनी माझे आरोप जर खोटे निघाले तर मी माझे शब्द मागे घेऊन जाहीर माफी मागण्यास तयार आहे, असे शेवटी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.