बेळगाव लाईव्ह :राज्यातील अबकारी अतिरिक्त आयुक्त वाय. डी. मंजुनाथ यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांवर ईडीने नुकत्याच टाकलेल्या धाडींशी माझा काहींही संबंध नाही. शिवाय या कारवाईबद्दल आत्ताच मत व्यक्त करणे घाईचे ठरणार असून तपास व चौकशी दिशा, प्रगती पाहून त्यावर बोलणे उचित ठरेल, असे मत सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.
बेळगाव शहरात आज शुक्रवारी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) नुकत्याच टाकलेल्या धाडीच्या प्रकरणाशी तुमचे नांव जोडले जात आहे? या धाडी राजकीय हेतूने प्रेरित आहेत का? या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. मंत्री जारकीहोळी यांनी आपले नांव या प्रकरणाशी कुठेही जोडले गेले नसल्याचे प्रथम स्पष्ट केले.
माझे भाऊजी अबकारी अतिरिक्त आयुक्त वाय. डी. मंजुनाथ यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांवर ईडीने धाडी टाकल्या असल्या तरी त्यावर आत्ताच काही बोलता येणार नाही. या प्रकरणाची चौकशी आणि तपास कोणत्या दिशेने होत आहे हे पाहून त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणे योग्य ठरणार आहे. या धाडींमध्ये राजकारण आहे किंवा नाही हे आत्ताच सांगता येणार नाही.

तथापी माझा या प्रकरणाशी संबंध नसला तरी गेल्या 12 वर्षापासून देशात काँग्रेस नेत्यांना कशा पद्धतीने लक्ष्य केले जात आहे हे सर्वश्रुत आहे.
त्यामुळे बेळगाव, हुबळी वगैरे ठिकाणी ईडीच्या धाडी पडणे हे कांही नवीन नाही असे सांगून ईडीच्या कारवाईशी माझा कांहीही संबंध नाही त्यामुळे एकंदरच याप्रकरणी सध्या कांहीही बोलणे घाईचे ठरेल, असे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी शेवटी पुन्हा एकदा स्पष्ट केले.




