बेळगाव शहराचा समावेश स्मार्ट सिटीत झाल्यापासून नागरिकांची मात्र वाताहत सुरू आहे. विविध कामे हाती घेण्यात आली असली तरी त्यांचे योग्य नियोजन नसल्याने ही कामे अर्धवट स्थितीत पडून आहेत. अशा परिस्थितीत या सार्या कामांची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
शहरातील रस्त्यांचे नियोजन आणि देखभालीची जबाबदारी आजपर्यंत महानगरपालिका कॅन्टोनमेंट बोर्ड आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने उचलले आहे. मात्र नियोजनाअभावी या सार्या खात्याने नागरीकांचे त्रासच करण्यात धन्यता मानली आहे. त्यामुळे या सार्या प्रकाराचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर आणि वाहतूक कोंडीवर होताना दिसत आहे. योग्य नियोजनाअभावी रस्त्यांची कामे हाती घेऊन ती अर्धवट स्थितीत टाकण्यात येत आहेत. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
आता स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून मुख्य रस्त्यांची देखभाल करण्यात येत आहे. स्मार्ट सिटी म्हणून शहराला लागणारी ओळख येत्या नवीन वर्षात साकारावी ही अपेक्षा शहरवासीयांना असली तरी नागरिकांचे हाल मात्र काही सुटत नाहीत. योग्य वेळेत काम पूर्ण केले असते तर आज ही परिस्थिती आली नसती. महानगरपालिकेने दाखवलेल्या हलगर्जीपणाचा फटका नागरिकांना बसला आहे. त्यामुळे यापुढे तरी होणारी कामे वेळेत करावीत अशी मागणी होत आहे.
सध्या शहरात विविध ठिकाणचे रस्ते काम सुरू करण्यात आले आहेत. स्मार्ट सिटीची व्याख्या धुळीला मिळवली आहे. निदान कामांना योग्य वेळेत पूर्ण करून नागरिकांच्या सोयीचे प्रयत्न हवे होते. मात्र तसे झालेच नाही. परिणामी वाहतूक कोंडी आणि धुळीने माखलेले रस्ते यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. याचा विचार करून स्मार्ट सिटी अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करावीत आणि भविष्याचा विचार करून हे रस्ते करावेत अशी मागणी होत आहे.