बेळगाव एपीएमसी मध्ये नव्याने सुरु करण्यात आलेल्या भाजी मार्केट मुळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे. एपीएमसी रोडवर ही समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवली आहे. त्यामुळे या ठिकाणी सिग्नल बसवावेत अशी मागणी होत होती. त्याची दखल घेऊन प्रशासनाने या ठिकाणी सिग्नल बसवले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात वाहतुकीची कोंडी होणार नाही असे चित्र दिसून येत आहे.
बेळगाव जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्र गोवा व कर्नाटक राज्यातून एपीएमसी मध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारी येत असतात. त्याचबरोबर आता नव्याने भाजी मार्केट सुरू झाल्याने येथे मोठी गर्दी उसळत आहे. वाहतुकीची कोंडी दररोज भेडसावत आहे त्यामुळे संगमेश्वर नगर चौकात सिग्नल बसवण्याची गरज होती. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोंडी होत असल्याने अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याचा विचार करून या ठिकाणी सिग्नल बसविण्यात आले आहेत.
सकाळच्या सत्रात हे सिग्नल बंद असले तरी दुपारी बारानंतर हे सिग्नल सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी कमी होत आहे. सिग्नल सुरू झाल्याने अनेक वाहतूकदारांना कोंडीचा सामना करावा लागत नाही. संगमेश्वर नगर चौकात हे सिग्नल बसविण्यात आल्याने अझमनगर, एपीएमसी रोड करून येणारे वाहतूक आणि त्याचबरोबर हनुमान नगर परिसरातून होणारी तसेच बेळगाव कडून येणारी वाहतुकीला शिस्त लागत आहे.
मोठ्या प्रमाणात उलाढाल होणाऱ्या एपीएमसी आणि भाजी मार्केटमध्ये वाहनांची तोबा गर्दी असते. याचाच परिणाम वाहतूक कोंडीवर होत होता. त्यामुळे संगमेश्वरनगर चौकात सिग्नल बसविल्याने मोठी समस्या मिटली आहे. हा सिग्नल कायमस्वरूपी सुरू ठेवावा अशी मागणी वाहतूक दारातून होत आहे.