बेळगाव लाईव्ह : यंदाच्या 14 सप्टेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामपंचायत हद्दीत प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) तसेच रासायनिक रंगांनी रंगविलेल्या गणेशमूर्तींच्या विसर्जनास परवानगी देऊ नये, असे निर्देश ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री ईश्वर बी. खंड्रे यांनी दिले आहेत. त्याऐवजी पर्यावरणपूरक, रंगरहित मातीच्या गणेशमूर्तींची पूजा व विसर्जन करण्यासाठी जनजागृती करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
यासंदर्भात विभागाच्या प्रधान सचिवांना लेखी सूचना देताना मंत्री खंड्रे यांनी सांगितले की, गणपती हा मातीपासून निर्माण झालेला देव मानला जातो. जलस्रोतांचे संरक्षण आणि पर्यावरण संवर्धन लक्षात घेऊन ग्रामपंचायत क्षेत्रात केवळ मातीच्या गौरी-गणेश मूर्तींची स्थापना व विसर्जनास परवानगी देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी.
गणेशोत्सवाच्या काळात कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची खबरदारी घेत आतापासूनच पीओपी गणेशमूर्तींचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची मदत घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. तसेच ग्रामपंचायतींच्या माध्यमातून नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत व्यापक जनजागृती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मंत्री खंड्रे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, पीओपी मूर्ती तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कॅल्शियम सल्फेट हेमिहायड्रेटसह विविध रासायनिक घटकांमुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो. याशिवाय अशा मूर्तींवर वापरल्या जाणाऱ्या रंगांमध्ये पारा, कॅडमियम, शिसे आणि इतर घातक धातूंचा समावेश असल्याने जलप्रदूषण वाढते.
पीओपीच्या मूर्ती तलाव, विहिरी, नद्या आणि इतर जलस्रोतांमध्ये विसर्जित केल्यानंतर त्यातील घातक धातू पाण्यात मिसळतात. त्यामुळे माणसे, जनावरे आणि जलचरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून जलचरांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढू शकते, असा इशाराही मंत्री ईश्वर खंड्रे यांनी दिला आहे.





