बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत होत्या. मात्र, गुरुवारपासून पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून सकाळपासूनच संततधार सुरू आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शहरात आणि ग्रामीण भागात कमालीचा गारवा निर्माण झाला असून हवेतील गारठ्यामुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे.
शहर परिसरासोबतच पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस होत असल्याने प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. परिणामी धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.
दोन दिवसाच्या उघडिपीमुळे नद्यांमधील पाणी ओसरू लागले होते मात्र आज पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने घटप्रभा, मार्कंडेय आणि मलप्रभा यांसारख्या आसपासच्या प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली आहे.

नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे नदीकाठच्या गावांना आणि सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. संततधार पावसामुळे रस्ते जलमय झाले असून दैनंदिन जनजीवनावरही याचा परिणाम दिसून येत आहे.
पुढील आठवड्यापासून श्रावण मास सुरू होत असल्याने आणि त्यानिमित्ताने विविध व्रत-वैकल्यांना सुरुवात होत असल्याने गेल्या दोन दिवसांपासून बाजारपेठेत नागरिकांची खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळत होती. मात्र, आज सकाळपासूनच सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे बाजारपेठेतील गर्दी निवळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.





