बेळगाव लाईव्ह : पश्चिम घाट आणि तिलारी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अर्धा टीएमसी क्षमतेचा राकसकोप्प जलाशय पूर्ण क्षमतेने भरला असून, मागील आठवड्यात हा जलाशय ओव्हरफ्लोही झाला होता. यानंतर सोमवारी महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी राकसकोप्प जलाशयाला भेट देऊन पाण्याची पातळी, आवक-जावक आणि जलसाठ्याची पाहणी केली.
बेळगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य आधार असलेल्या राकसकोप्प जलाशयात यंदाच्या उन्हाळ्यात पाणीसाठा जवळपास संपल्याने शहरावर पाणीटंचाईचे संकट ओढावले होते. मान्सून लांबल्यामुळे नागरिकांना पाणीपुरवठ्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. त्या काळात महापालिकेला पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी लागली होती.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून पश्चिम घाट आणि तिलारी परिसरात दररोज 40 ते 50 मिमी पाऊस पडत असल्याने राकसकोप्प जलाशय पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
पाहणीनंतर बोलताना आयुक्त कार्तिक एम. म्हणाले की, राकसकोप्प आणि हिडकल या दोन्ही जलाशयांतून शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. शहरातील 10 प्रभागांमध्ये 24 तास पाणीपुरवठा सुरू आहे. पाणीटंचाईच्या काळात याच भागांना दोन ते तीन दिवसांनी केवळ दोन तास पाणीपुरवठा केला जात होता. आता जलाशय भरल्यामुळे पुन्हा 24 तास पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

उर्वरित 48 प्रभागांमध्ये उन्हाळ्यात आठ ते दहा दिवसांनी पाणी सोडले जात होते. आता या भागांनाही दोन ते तीन दिवसांनी नियमित पाणीपुरवठा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
राकसकोप्प जलाशयाची पूर्ण जलपातळी 2,475 फूट असून, सध्या जलाशय पूर्ण भरलेला आहे. राकसकोप्प आणि हिडकल जलाशयांतून शहराला एकूण 105 एमएलडी पाणीपुरवठा होत असून, मे महिन्यापर्यंत शहराला पाणीटंचाई जाणवणार नाही, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.
यावेळी केयूडीएफसीचे अभियंते, महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.





