बेळगाव : काँग्रेसचे मंत्री बी. नागेंद्र यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपकडून आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले आहे. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सलग तिसऱ्या दिवशी भाजपचे अहोरात्र धरणे आंदोलन सुरू असून, बुधवारी बेळगाव ग्रामीण आणि खानापूर तालुका भाजपच्या वतीने शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी होत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नागेंद्र यांच्या विरोधातील आंदोलनात बेळगाव ग्रामीण वरील भ्रष्टाचारात सडकून टीका करण्यात आली.
मंत्री बी. नागेंद्र यांनी राजीनामा द्यावा आणि काँग्रेस सरकारमधील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. काँग्रेस सरकार जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असून, भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला.
बेळगाव ग्रामीण भाजपचे युवा नेते युवराज जाधव यांनी काँग्रेस सरकारवर सडकून टीका केली. बेळगाव ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींमध्ये कथित गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करत सामान्य नागरिकांच्या कामांसाठीही पैशांची मागणी केली जात असल्याचा दावा त्यांनी केला.
अवैध क्लब पुन्हा सुरू केल्यास आंदोलनाचा इशारा
बेळगाव परिसरातील अवैध क्लबच्या मुद्यावरही भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. सध्या बंद असलेले अवैध क्लब पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास नागरिक आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील, असा इशारा सभेत देण्यात आला. अवैध व्यवहारांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही, असे वक्त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक जनतेला साड्या, कुकर तसेच दोन हजार रुपयांचे प्रलोभन देऊन दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. अशा प्रकारच्या राजकारणामुळे पुढील पिढीचे नुकसान होत असून, भविष्यात तरुणांना रोजगारासाठी पलायन करण्याची वेळ येऊ शकते, अशी चिंता व्यक्त करण्यात आली.
ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहारावर निशाणा
ग्रामपंचायतीमध्ये साध्या संगणकीय उताऱ्यासाठी १५ ते २० हजार रुपयांची मागणी केली जात असल्याचा आरोप भाजपच्या व्यासपीठावरून करण्यात आला. वरिष्ठ नेत्यांचा किंवा ‘अण्णां’चा फोन आल्यानंतरच नागरिकांना उतारे दिले जात असल्याचा दावाही करण्यात आला.
या आंदोलनात माजी आमदार संजय पाटील आणि माजी आमदार अरविंद पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. काँग्रेस सरकारच्या कथित भ्रष्टाचाराविरोधातील लढा यापुढेही सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
‘५ हजार कोटींचा भ्रष्टाचार’ झाल्याचा धनंजय जाधव यांचा आरोप
भाजप नेते धनंजय जाधव यांनी आपल्या भाषणातून काँग्रेस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. योजनांच्या निधीच्या वितरणामध्ये महिन्यांचे अंतर ठेवून जनतेला संभ्रमात टाकले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रक्रियेत ५ हजार कोटी रुपये गिळंकृत करण्यात आल्याचा गंभीर आरोप जाधव यांनी केला.
याशिवाय, १९ हजार २० लाभार्थ्यांचे पैसे एकाच बँक खात्यावर जात असल्याचा, तर २३ हजार २६२ बँक खाते नसलेल्या व्यक्तींना पैसे दिले जात असल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.
गर्भवती महिला, विद्यार्थ्यांच्या पोषण आहारातही कमिशनचा आरोप
धनंजय जाधव यांनी गर्भवती महिलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारापासून ते शालेय विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अंडी, केळी आणि पौष्टिक आहारापर्यंत विविध योजनांमध्ये कमिशनखोरी होत असल्याचा आरोप केला.
पोषण आहाराच्या पॅकिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकमध्येही कमिशन घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराचा कळस आहे,” अशी टीका करत हे प्रकरण पूर्णपणे बाहेर काढल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे जाधव यांनी सांगितले.
‘अक्का कंपनी’च्या माध्यमातून बेळगाव ग्रामीणला लुटण्याचा आरोप
आपल्या भाषणात धनंजय जाधव यांनी ईस्ट इंडिया कंपनीचा दाखला देत काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वावरही निशाणा साधला. बाहेरून आलेली ‘अक्का कंपनी’ बेळगाव ग्रामीणला लुटत असल्याचा आरोप त्यांनी केला.
हा प्रकार थांबवण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी संघटितपणे लढा देण्याचे आवाहन जाधव यांनी केले. भ्रष्टाचाराच्या कथित प्रकरणांची चौकशी होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, भाजपच्या नेत्यांनी केलेले ₹५ हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे तसेच बँक खात्यांमधील अनियमिततेचे आरोप हे त्यांच्या भाषणातील दावे आहेत. या आरोपांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी या वृत्तातून झालेली नाही.





