,बेळगाव लाईव्ह: शिवम असोसिएट्स आणि आदित्य या आर्थिक फसवणूक प्रकरणांतील गुंतवणूकदारांना सीआयडीची चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणताही परतावा दिला जाणार नाही, अशी स्पष्ट माहिती सहाय्यक आयुक्त तथा उपविभागीय दंडाधिकारी श्रवण नायक यांनी दिली आहे.
त्यांनी सांगितले की, या दोन्ही प्रकरणांची सध्या गुन्हे अन्वेषण विभाग (CID) सखोल चौकशी करत आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच गुंतवणूकदारांकडून आवश्यक कागदपत्रे मागवून कर्नाटक ठेवीदारांच्या हितसंरक्षण कायदा (KPIDFE Act) अंतर्गत निधी परताव्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.
सीआयडीकडून सध्या आर्थिक व्यवहारांचा संपूर्ण तपशील, गुंतवणुकीची नोंद, निधीचा प्रवाह आणि संबंधित आर्थिक व्यवहारांची पडताळणी केली जात आहे. या तपासादरम्यान प्रकरणाशी संबंधित काही वाहनेही पोलिसांनी जप्त केली आहेत.

श्रवण नायक यांनी स्पष्ट केले की, चौकशी पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणात नेमकी किती रक्कम जमा करण्यात आली, किती गुंतवणूकदार फसले आणि फसवणुकीचे नेमके स्वरूप काय होते, हे स्पष्ट होणार आहे. त्यानंतर संबंधित विभागांकडून आणि गुंतवणूकदारांकडून आवश्यक कागदपत्रे गोळा करून नियमानुसार परताव्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
दरम्यान, परताव्याच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो गुंतवणूकदारांचे लक्ष आता सीआयडीच्या अंतिम अहवालाकडे लागले आहे.





