बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन बेळगाव बायपासच्या पहिल्या टप्प्याचे (पॅकेज-1) काम उर्वरित पॅकेजची वाट न पाहता तातडीने सुरू करण्याची मागणी खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे सचिव उमाशंकर यांच्याकडे केली.
दिल्लीत झालेल्या भेटीदरम्यान शेट्टर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (NHAI) पॅकेज-2 आणि पॅकेज-3 मधील विलंबामुळे पॅकेज-1 चे काम रखडू न देता स्वतंत्रपणे निविदा प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती केली.
यावेळी त्यांनी सांगितले की, बायपासच्या उर्वरित टप्प्यांतील विलंबामुळे बेळगाव शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत असून, पॅकेज-1 चे काम तातडीने सुरू झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो.

याशिवाय, बेळगाव–हुनगुंद–रायचूर राष्ट्रीय महामार्गालगत शेतकऱ्यांना आपल्या शेतांमध्ये जाण्यास मोठ्या अडचणी येत असल्याचा मुद्दाही त्यांनी सचिवांसमोर मांडला. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आवश्यक त्या ठिकाणी सर्व्हिस रोडची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली.
यावर सचिव उमाशंकर यांनी दोन्ही मागण्यांचा गांभीर्याने विचार करून संबंधित अधिकाऱ्यांमार्फत लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.





