बेळगाव लाईव्ह: खानापूर तालुक्यातील गुंजी गावात गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्याच्या मुक्त संचारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. वनविभागाने गेल्या सहा दिवसांपासून पिंजरा, गस्त आणि सतत देखरेख अशा उपाययोजना राबवल्या असल्या तरी बिबट्या अद्याप जेरबंद झालेला नाही. त्यामुळे वनविभागाने आता मोहीम अधिक तीव्र करत वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही प्रत्यक्ष मैदानात उतरवले आहे.
सोमवारी लोंढा वनपरिक्षेत्र अधिकारी एम. गणाचारी यांनी गुंजीत दाखल होऊन बिबट्याच्या हालचालींच्या परिसराची पाहणी केली. पिंजऱ्याची तपासणी, बिबट्याच्या वावराचा आढावा आणि स्थानिक कर्मचाऱ्यांशी चर्चा करत त्यांनी मोहिमेचा वेग वाढविण्याचे निर्देश दिले. बिबट्याला आकर्षित करण्यासाठी पिंजऱ्यात कुत्रा ठेवण्यात आला असला तरी तो अद्याप पिंजऱ्याजवळ फिरकत नसल्याने वनविभागासमोर मोठे आव्हान उभे आहे.
वनपाल लक्ष्मण वाळद यांच्यासह वनकर्मचाऱ्यांना गावात दिवसरात्र गस्त वाढविणे, बिबट्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणे आणि ग्रामस्थांशी सातत्याने संपर्क ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांशी संवाद साधत सुरक्षिततेबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
वनविभागाने स्पष्ट केले आहे की, बिबट्या जेरबंद होईपर्यंत मोहीम थांबवली जाणार नाही. नागरिकांनी रात्रीच्या वेळी शेत, जंगल किंवा वनराई परिसरात जाणे टाळावे, जनावरांचे गोठे आणि घरांचे दरवाजे सुरक्षित ठेवावेत तसेच बिबट्याचे दर्शन झाल्यास कोणताही धोका न पत्करता तात्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या बिबट्याच्या वावरामुळे गुंजीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम असून, वनविभागाने ही मोहीम लवकर यशस्वी करून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.





