बेळगाव लाईव्ह : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेशी संबंधित अलीकडेच एक खेदजनक घटना निदर्शनास आली असून, यामुळे मन व्यथित झाले आहे. शिवराय हे संपूर्ण देशासाठी स्वाभिमान आणि शौर्याचे प्रतीक आहेत, त्यामुळे त्यांच्या प्रतिमेबाबत निष्काळजीपणा किंवा अनादर होणे ही अत्यंत चिंतेची बाब आहे, अशी खंत सामाजिक कार्यकर्ते शाम पाटील यांनी व्यक्त केली आहे.
एका उपक्रमात लहान मुलांना महाराजांचा फोटो दाखवला असता त्यांनी अभिमानाने जयघोष केला. यावरून जर लहान मुलांना महाराजांबद्दल इतका आदर असेल, तर मोठ्यांनीही त्यांच्या प्रतिमेचा आणि विचारांचा सन्मान जपणे गरजेचे असल्याचा संदेश मिळतो, असे शाम पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.
आपण घरात किंवा कार्यालयात लावलेल्या महापुरुषांच्या प्रतिमा जुन्या किंवा खराब झाल्यास, त्यांची सन्मानपूर्वक विल्हेवाट लावणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आजच्या युवा पिढीला मोबाईलसोबतच शिवरायांचे विचार, त्याग आणि राष्ट्रप्रेमाचे संस्कार देणे गरजेचे आहे. नागरिकांनी महाराजांच्या विचारांचा सदैव सन्मान करावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते शाम पाटील यांनी केले आहे.





