बेळगाव लाईव्ह : माहिती हक्क कायदा कमकुवत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राज्य माहिती आयोगाच्या आयुक्तांवर तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र न्यायालयीन लढा उभारण्यात येईल, असा इशारा माहिती हक्क कार्यकर्ते भीमप्पा गडाद यांनी दिला आहे. बेळगाव येथील कन्नड साहित्य भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांनी मुख्य सचिव व प्रशासकीय सुधारणा विभागाच्या सचिवांकडे पुराव्यांसह तक्रार दाखल केली होती. सरकारने या तक्रारी राज्यपालांकडे पाठवून पाच महिने झाले तरी कोणतीही कारवाई झालेली नाही, जी अत्यंत चिंताजनक बाब आहे. यावर योग्य चौकशी करून कारवाई न झाल्यास राजभवनातील संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून न्यायालयात दाद मागण्यात येईल, असे भीमप्पा गडाद यांनी स्पष्ट केले.
माहिती आयुक्तांच्या नियुक्तीत सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप असून हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तसेच, २५ हून अधिक आरटीआय अर्ज दाखल करणाऱ्या कार्यकर्त्यांना बेकायदेशीरपणे काळ्या यादीत टाकल्याचे सांगून माहिती आयोग नियमांचे उल्लंघन करत आहे, असा आक्षेपही त्यांनी घेतला.
शासकीय कर्मचाऱ्यांची वैयक्तिक माहिती नाकारून कार्यकर्त्यांची दिशाभूल केली जात असून, माहिती आयुक्तांच्या कामकाजाबाबत एकूण १० गंभीर गुन्हे दाखल आहेत.
त्यामुळे संविधानाच्या विरोधात वागणाऱ्या आयुक्तांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा भीमप्पा गडाद यांनी दिला आहे.





