बेळगाव लाईव्ह :बेळगाव ते धारवाड या नव्या रेल्वे मार्गासाठी सुपीक शेतजमीन संपादित करण्याच्या कृती विरोधात आक्रमक होत संतप्त शेतकऱ्यांनी आज बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडून संपादित केलेल्या शेत जमिनीला योग्य मोबदला मिळावा, तसेच जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनाप्रसंगी बोलताना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चुन्नप्पा पुजारी यांनी प्रशासन आणि रेल्वे विभागाच्या भरपाई धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी मलप्रभा नदीच्या खोऱ्यातील अतिशय सुपीक जमिनीवर घेतलेल्या महसुलाच्या बदल्यात दिल्या जाणाऱ्या मोबदल्यामध्ये अन्याय केला जात असल्याचा आरोप केला.
“बिदडी परिसरात एका एकरीसाठी 3 कोटी रुपयांपर्यंत भरपाई दिली जात आहे, पण बेळगावमधील शेतकऱ्यांना त्याहून कमीच दिले जाते” अशी तक्रार आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलनातप्रसंगी संतप्त शेतकऱ्यांनी बेळगाव -धारवाड नव्या रेल्वे मार्गासाठी केल्या जाणाऱ्या सुपीक शेत जमिनीच्या संपादनाबद्दल तीव्र भाषेत आपला रोष व्यक्त केला; काहींच्या हावभावांत आणि घोषणांमध्ये तशी नाराजी स्पष्ट दिसून येत होती.

शेतकरी संघटनेने सरकारवर दबाव वाढवण्यासाठी बेळगाव ते धारवाड या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्प अंतर्गत जमीन गमावलेल्या प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला रेल्वे अथवा संबंधित शासकीय विभागात नोकरी देण्याची मागणी देखील सरकार समोर ठेवली. “जर आमच्या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही तर आंदोलन अधिक तीव्र रूप घेईल” असा इशारा यावेळी शेतकरी नेत्यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनामध्ये शेतकरी नेते प्रकाश नायक, किशन नंदी, प्रेम चौगला, पडीगौडा बागेवाडी, जावेद मुल्ला, मारुती लोकूर, परशुराम जाधव आदींसह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या सर्व आंदोलकांनी जोरदार घोषणांसह प्रशासनाला तातडीने निर्णय घेण्याचा न हून तीव्र आंदोलनाला सामोरे जाण्यास तयार रहा, असा इशारा दिला.




