बेळगाव लाईव्ह : जमिनीच्या आरटीसी नोंदणीत प्रशासनाकडून होणाऱ्या दिरंगाईचा निषेध नोंदवण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातील बड वाल्मिकी बेडर समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत सत्याग्रह सुरू करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
सन १९७८ पूर्वीच्या वन अतिक्रमण जमिनी जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर झाल्या आहेत. मात्र, अद्याप त्यांची आरटीसी दस्तऐवजात नोंद करण्यात आलेली नाही.
केंद्र सरकार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश असतानाही स्थानिक पातळीवर कोणतीही कारवाई झालेली नाही. सद्यस्थितीत बेळगाव, खानापूर, बैलहोंगल आणि गोकाक या चार तालुक्यांमध्ये हा आरटीसी नोंदणीचा प्रश्न रेंगाळला आहे.
“वनहक्क समितीच्या परिपत्रकानुसार या मंजूर जमिनींची नोंद आरटीसीच्या ९ व्या रकान्यातच होणे कायदेशीर आहे, मात्र अधिकारी ती नोंद ११ व्या रकान्यात करण्याचा प्रयत्न करत आहेत. पात्र लाभार्थ्यांना ९ व्या रकान्यात नोंदणी करून तातडीने न्याय मिळावा,” अशी मागणी वाल्मिकी नायक संघाच्या अध्यक्षांनी केली.
प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढावा, या मागणीसाठी बड वाल्मिकी बेडर समाजातील नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत.




