बेळगाव लाईव्ह: आयुष्यभराच्या संघर्षानंतर शेवटच्या प्रवासालाही कोणी आपले नसल्याची वेदनादायी वेळ एका महिलेवर आली. मात्र, त्याच वेळी काही संवेदनशील तरुणांनी पुढे येत माणुसकीचे दर्शन घडवले आणि तिच्या अंत्यसंस्काराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली.
टिळकवडी येथील रहिवासी शकुंतला रामचंद्र गडकरी या पतीच्या निधनानंतर गेल्या काही वर्षांपासून एकट्याच राहत होत्या. गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या शकुंतला यांना योग्य उपचार मिळू शकले नाहीत. शुक्रवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी कुटुंबातील कोणीही पुढे आले नाही.
घटनेची माहिती मिळताच महानगरपालिका सदस्य शंकर पाटील, समाजसेवक गंगाधर पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण करून सदाशिवनगर स्मशानभूमीत शकुंतला गडकरी यांच्यावर विधीपूर्वक अंत्यसंस्कार केले.
या कृतीमुळे संकटसमयीही माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. शंकर पाटील, गंगाधर पाटील आणि त्यांच्या टीमने यापूर्वीही अनेक निराधार व अनाथ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करून समाजापुढे सेवाभावाचा आदर्श ठेवला आहे.
या हृदयस्पर्शी घटनेनंतर त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, “नाती रक्ताचीच असावी असे नाही, माणुसकीचीही असतात,” हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला.





