बेळगाव लाईव्ह:बेळगाव जिल्ह्यात यंदा आतापर्यंत सरासरीपेक्षा सुमारे 20 टक्के कमी पाऊस झाला असून, 15 तालुक्यांपैकी केवळ सात तालुक्यांमध्येच सरासरी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. मात्र पुढील काही दिवसांत चांगला पाऊस झाल्यास परिस्थितीत सुधारणा होऊ शकते, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
जिल्ह्यातील जलसाठ्याचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की, प्रशासनाचे लक्ष कृष्णा, घटप्रभा आणि मलप्रभा या प्रमुख नद्यांवरील धरणांमधील पाणीसाठ्यावर आहे. कृष्णा नदीत सध्या महाराष्ट्रातूनही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून 85 ते 90 हजार क्युसेक इतका प्रवाह सुरू आहे. आवश्यकतेनुसार पाणी सोडण्याबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने पाणी उचलले जात आहे.
हिडकल धरणात सध्या 25 टीएमसी पाणीसाठा असून, पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन विविध कालव्यांमध्ये मर्यादित प्रमाणात पाणी सोडण्याची शिफारस करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
मात्र मलप्रभा धरणाची स्थिती चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. सध्या धरणात केवळ 14 टीएमसी पाणीसाठा आहे, तर गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा सुमारे 29 टीएमसी होता. ऊस व इतर उभी पिके वाचवण्यासाठी शेतकरी संघटनांकडून सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी होत असली, तरी पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत पिण्याच्या पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊनच निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
यासंदर्भात प्रादेशिक आयुक्तांशी चर्चा झाली असून, परिस्थितीनुसार मर्यादित प्रमाणात पाणी सोडण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले.





