बेळगाव लाईव्ह : विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेळगावमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले. आंबेडकर गार्डन येथून सुरू झालेला मोर्चा चन्नम्मा सर्कलमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला. या आंदोलनात सुमारे ७०० महिला सहभागी झाल्या.
आंदोलक महिलांनी, “जिल्हाधिकारी येऊन आमचे निवेदन स्वीकारत नाहीत, तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार,” अशी भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला.
महिलांनी हा दिवस “काळा दिवस” म्हणून पाळत केंद्र सरकारविरोधात निषेध व्यक्त केला. २०१८ पासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात कोणतीही वाढ करण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला. वारंवार आश्वासने मिळूनही अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याचे आंदोलकांनी सांगितले.

यावेळी ‘FRI’ या नव्या योजनेवरही महिलांनी नाराजी व्यक्त केली. आधार कार्ड, स्मार्टफोन किंवा ओटीपीची सुविधा नसल्यामुळे ग्रामीण व गरीब कुटुंबांतील अनेक लाभार्थी योजनांपासून वंचित राहत असल्याचा आरोप करण्यात आला. याचा परिणाम लहान मुलांच्या पोषण आहारावर आणि गर्भवती महिलांनाही होत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन मानधनवाढीसह सर्व प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली.





