बेळगाव लाईव्ह :
दररोजप्रमाणे गाय घेऊन जंगलात गेलेल्या २५ वर्षीय महेश गावडे यांच्यासाठी बुधवारचा दिवस आयुष्यभराची जखम देऊन गेला. खानापूर तालुक्यातील जांबोटी परिसरातील हुळंद गावाजवळ अचानक समोर आलेल्या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला चढवला.
जीव वाचवण्यासाठी त्यांनी झाडावर चढण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र अस्वलाने पाठलाग करत त्यांच्या पायाला चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले.
हुळंद गावातील महेश गावडे हे आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शेती आणि पशुपालन करतात. बुधवारी सायंकाळी गाय घेऊन घरी परतत असताना जंगल परिसरात दबा धरून बसलेल्या अस्वलाशी त्यांचा सामना झाला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे घाबरलेल्या महेश यांनी जवळच्या झाडाचा आधार घेत जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अस्वलाच्या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी धावले. कणकुंबी वनक्षेत्राचे आरएफओ माने यांच्या मार्गदर्शनाखाली जखमी महेश यांना तातडीने उपचारासाठी बेळगाव येथील विजया ऑर्थो रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृतीवर डॉक्टरांचे लक्ष आहे.
जांबोटी-कणकुंबी परिसर घनदाट जंगलांनी वेढलेला असल्याने येथे अस्वल, बिबट्या आणि रानडुक्कर यांचा वावर कायम असतो. पावसाळ्यात वन्य प्राण्यांच्या हालचाली वाढत असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
दरम्यान, वनविभागाने जखमी शेतकऱ्याला शासनाकडून मिळणारी सर्व मदत देण्याचे आश्वासन दिले असून नुकसानभरपाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या घटनेनंतर जंगलालगतच्या भागात गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.




