बेळगाव लाईव्ह : गेल्या तीन दिवसांपासून बेळगाव येथील एपीएमसी भाजी मार्केट, होलसेल मार्केट आणि संपूर्ण मार्केट यार्ड परिसर पूर्णपणे अंधाराखाली बुडाला आहे. या परिसरात सलग तीन दिवस विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे संपूर्ण मार्केटचे कामकाज ठप्प होण्याच्या मार्गावर आले असून, याचा मोठा फटका स्थानिक व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे.
विशेष म्हणजे, अलीकडेच बेळगावमधील खाजगी एपीएमसी मार्केट देखील याच मुख्य एपीएमसी यार्डात शिफ्ट करण्यात आले आहे. दोन्ही मार्केट एकत्र आल्यामुळे या ठिकाणी अचानक व्यापाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, मालाची आवक वाढली आहे आणि पर्यायाने संपूर्ण जिल्ह्यातून, महाराष्ट्राच्या सीमेवरील गावातून आणि सीमाभागातून येणाऱ्या ग्राहकांची गर्दीही प्रचंड वाढली आहे. अशा प्रकारे एकाच छताखाली व्यापार वाढलेला असताना आणि रोज कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होत असताना, मूलभूत सुविधा मात्र पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र येथे पाहायला मिळत आहे. इतक्या मोठ्या गजबजलेल्या व्यावसायिक केंद्रात सलग तीन दिवस वीज नसणे ही अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी बाब बनली आहे.
या अखंडित वीज संकटामुळे मार्केट यार्डातील सर्वच घटकांचे हाल होत आहेत. एपीएमसीमध्ये भाजीपाल्याची मुख्य आवक, तोलाई आणि खरेदी-विक्रीचे व्यवहार हे प्रामुख्याने रात्रीच्या आणि पहाटेच्या वेळेस सुरू होतात. मात्र वीज नसल्यामुळे संपूर्ण परिसरात रात्रीच्या वेळी गडद अंधाराचे साम्राज्य असते. अशा परिस्थितीत शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोबाईलच्या फ्लॅशलाईट किंवा बॅटरीच्या उजेडात भाजीपाल्याचे व्यवहार करावे लागत आहेत. अंधारामुळे मालाची मोजणी करताना चुका होणे, हिशोबात घोळ होणे आणि मालाची चोरी होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. भाजी विक्रेत्यांसोबतच या परिसरात येणाऱ्या शेतकरी व ग्राहकांसाठी सेवा देणाऱ्या हॉटेल धारकांनाही याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. विजेअभावी हॉटेलमधील फ्रिज, मिक्सर, ग्राइंडर यांसारखी उपकरणे बंद असल्याने त्यांचे दैनंदिन नुकसान होत आहे. तसेच होलसेल व्यापाऱ्यांचे बिलिंग, कॉम्प्युटर आणि गोदामातील मालाची चढ-उतार पूर्णपणे रखडली आहे.

व्यापार आणि गर्दी वाढलेल्या या संवेदनशील काळात रात्रीचा अंधार हा सुरक्षेच्या दृष्टीनेही अत्यंत घातक ठरत आहे. अंधाराचा गैरफायदा घेऊन चोऱ्यांचे प्रमाण वाढण्याची आणि अपघात घडण्याची भीती व्यापारी व्यक्त करत आहेत. एकीकडे खाजगी मार्केट आणून शासनाने व्यापार तर वाढवला, परंतु त्या प्रमाणात पुरेशी पायाभूत सुविधा देण्यास प्रशासन अपयशी ठरल्याची भावना व्यापाऱ्यांमध्ये आहे.
एकत्रित मार्केटमुळे निर्माण झालेल्या या मोठ्या समस्येकडे हेस्कॉमसह स्थानिक प्रशासनाने तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे. वाढत्या व्यापाराला खिळ बसण्यापूर्वी आणि व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान थांबवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून येथील विद्युत पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा, अशी आग्रही मागणी आता संपूर्ण बेळगाव एपीएमसी मार्केटमधील व्यापारी, हॉटेल व्यावसायिक आणि शेतकऱ्यांकडून केली जात आहे.




