बेळगाव लाईव्ह: महाराष्ट्रात सीमाप्रश्नासंदर्भात उच्चाधिकार समितीची बैठक झाल्यानंतर कर्नाटक सरकारने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. बेळगाव दौऱ्यावर आलेले कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना, “महाजन आयोगाचा अहवाल हाच अंतिम असून सीमाप्रश्नावर कर्नाटक सरकारची भूमिका बदललेली नाही,” असे स्पष्ट केले.
सुवर्णसौध येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, राज्याच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे. या भूमिकेला अधिकृत स्वरूप देण्यासाठी **बेळगाव महानगरपालिकेची विशेष बैठक बोलावून ‘बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग’ असल्याचा ठराव मंजूर करण्याबाबत बेंगळुरूला बैठक घेऊन सर्वांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगितले
सीमाप्रश्नावर महाराष्ट्रात अलीकडेच हालचाली वाढल्या असताना कर्नाटककडून पुन्हा महाजन आयोगाचा आधार घेतल्याने सीमावादावर नव्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यावेळी शिवकुमार यांनी म्हादई पाणीवाटप प्रकल्पाचाही उल्लेख केला. केंद्र सरकारकडून अद्याप अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नसला, तरी गोवा आणि महाराष्ट्राशी समन्वय साधून हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
कानडी संघटनांच्या प्रतिनिधींना लवकरच बेंगळुरूमध्ये बोलावून वरिष्ठ स्तरावर चर्चा करून पुढील भूमिका निश्चित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेला मंत्री सतीश जारकीहोळी, एम. बी. पाटील, यु. टी. खादर आणि ईश्वर खंड्रे उपस्थित होते.




