बेळगाव लाईव्ह :हलगा–मच्छे बायपासच्या कामामुळे येळ्ळूर मार्ग नागरिकांसाठी धोकादायक ठरत असून, गेल्या पंधरा दिवसांत तब्बल 17 जण अपघातात जखमी झाल्याने ग्रामस्थांचा संताप उफाळून आला आहे. निसरडा रस्ता, बेदरकार वेगाने धावणारे अवजड डंपर आणि अपुऱ्या सुरक्षा उपायांमुळे रोजच अपघात होत असल्याचा आरोप करत येळ्ळूर ग्रामस्थांनी अशोका बिल्डकॉन कंपनीला कडक शब्दांत निवेदन सादर केले. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यावर साचलेली माती, काँक्रिट आणि ऑइलमुळे पावसाळ्यात संपूर्ण मार्ग निसरडा झाला आहे. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पावसानंतर तीन जण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर बुधवारी झालेल्या पावसात आणखी 14 दुचाकीस्वार घसरून पडल्याने अपघातांची मालिका सुरूच असल्याचे त्यांनी सांगितले.
निवेदनात रस्त्याची तातडीने स्वच्छता, अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण, दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर्स व इतर सुरक्षा उपाय त्वरित राबवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच येळ्ळूर येथील प्रस्तावित पुलाची रुंदी आणि उंची वाढवून शेतकरी व नागरिकांची गैरसोय दूर करण्याचीही मागणी करण्यात आली.

“रोज अपघात होत असताना कंपनी प्रशासनाने दुर्लक्ष करणे असह्य आहे. मागण्या मान्य न झाल्यास येळ्ळूरवासी रस्त्यावर उतरून काम बंद पाडतील,” असा इशारा माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, माजी उपाध्यक्ष प्रमोद पाटील आणि माजी सदस्य शांताराम कुगजी यांनी दिला.
या निवेदनावर येळ्ळूर गावातील प्रमुख नागरिक, तरुण मंडळी आणि ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदन देतेवेळी माजी ग्राम पंचायत सदस्य शिवाजी नांदुरकर, मनोहर पाटील,आनंद पाटील, यलाप्पा जाधव, निखिल पाटील,मधु नांदुरकर, मनोज बेकवाडकर, मधु पाटील, चेतन हुंदरे,महेश पाटील, हेमंत पाटील,सत्यजीत पाटील,अभिषेक पाटील, मारुती यळगुकर, मुकेश पाटील, प्रशांत भातकांडे,सोमनाथ बाबले,किशोर हलगेकर, पृथ्वीराज पाटील आदी उपस्थित होते.




