बेळगाव लाईव्ह : खानापूर येथील न्यायालयात सुरू असलेल्या एका जुन्या खटल्यामध्ये तत्कालीन तपासाधिकारी (CPI) जी. एम. पाटील यांची साक्ष पूर्ण झाली आहे. हा खटला आमदार रामदास कदम यांच्याशी संबंधित असून, या सुनावणीला रामदास कदम गैरहजर होते. न्यायालयाने आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १० जुलै रोजी निश्चित केली आहे.
हे प्रकरण सन २००६ मधील एका महामेळाव्याशी संबंधित आहे. २६ ऑक्टोबर २००६ रोजी खानापूर येथील ताराराणी हायस्कूलच्या मैदानावर हा मेळावा पार पडला होता. या मेळाव्यात झालेल्या कथित चिथावणीखोर भाषणांवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस तक्रारीनुसार, या मेळाव्यात आरोपींनी जाणीवपूर्वक भाषिक सलोखा बिघडवणारी भाषणे केली होती. मराठी भाषिकांना प्रक्षोभित करून कन्नड भाषिकांबद्दल द्वेष निर्माण करणे, शांततेचा भंग करणे आणि कन्नड भाषिकांवर अत्याचार करण्यासाठी लोकांना भडकवणे, असे गंभीर आरोप संशयितांवर ठेवण्यात आले आहेत.

याशिवाय, कर्नाटक सरकारच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आणि कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जखमी करण्याच्या उद्देशाने लोकांना चिथावणी देणे, या कलमांखालीही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी खानापूर येथील जेएमएफसी न्यायालयात सुरू असून पुढील तारीख १० जुलै देण्यात आली आहे. या केस मध्ये कदम यांच्या बाजूने फौजदारी वकील शामसुंदर पत्तार, वकील हेमराज बेंचनावर, वकील जोतिबा पाटील काम पहात आहेत.




