बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील उचवडे, तीर्थकुंडे आणि जांबोटी या गावांना जोडणारा मुख्य रस्ता सध्या पूर्णपणे चिखलमय झाला आहे. या रस्त्यावरून साधी दुचाकी चालवणेही अशक्य झाले असून, चिखलात अडकलेली वाहने चार-पाच लोकांना खांद्यावरून वाहून न्यावी लागत आहेत.
या दुरवस्थेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर काँग्रेस नेते दीपक कवटणकर यांनी स्थानिक आमदारांवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
आमदारांना जाब विचारताना दीपक कवटणकर म्हणाले की, या मतदारसंघातील जनतेने एक लाखाहून अधिक मते देऊन तुम्हाला निवडून दिले आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांत या भागाच्या विकासासाठी काय केले? या रस्त्यावर खडीकरण तर दूरच, पण एक टोपली मातीही टाकण्यात आलेली नाही. लोकांना साधे पायी चालणेही कठीण झाले आहे.
जांबोटी भागातील या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधी कधी लक्ष देणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. टीव्हीवर आणि इतर माध्यमांमध्ये केवळ विकासाच्या मोठ्या गप्पा मारल्या जातात, मात्र प्रत्यक्ष जमिनीवर नागरिकांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
-०-
हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. दीपक कवटणकर यांनी आमदारांना धारेवर धरले तेव्हा त्यांच्यासोबत स्थानिक ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनीही लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.





