बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम (पीडब्ल्यूडी) खाते मिळाल्याबद्दल समाधान असल्याची भावना मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केली. गोकाक येथे रविवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी गेल्या तीन वर्षांत पीडब्ल्यूडी विभागात चांगली विकासकामे केल्याचा दावा केला.
जिल्ह्यातील विविध उड्डाणपूल प्रकल्प प्रारंभिक टप्प्यात असून ते शक्य तितक्या लवकर पूर्ण केले जातील, असे त्यांनी सांगितले. बेळगाव हा मोठा जिल्हा असल्याने दुसऱ्या टप्प्यात आणखी एक मंत्रिपद मिळू शकते, असेही ते म्हणाले.
आमदार आसिफ सेठ यांना मंत्रिपद देण्याच्या मागणीबाबत बोलताना जारकीहोळी म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. ज्येष्ठ किंवा नवोदित आमदारांना मंत्रिपद द्यायचे की नाही, हा पूर्णपणे हायकमांडचा विषय आहे.
केपीसीसी अध्यक्षपदातील संभाव्य बदलांबाबत विचारले असता, ‘वन मॅन, वन पोस्ट’ धोरणाची अंमलबजावणी सुरू असून पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचे पालन करणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षपद नसले तरी पक्षसंघटना मजबूत करण्याचे काम सुरूच राहील, असेही ते म्हणाले.
आदित्यराज कॅपिटल प्रकरणाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, हे प्रकरण पूर्वीच्या शिवम असोसिएट्स प्रकरणासारखेच असून सुमारे ५० कोटी रुपयांहून अधिक ठेवींचा संबंध असल्याने तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे. तपास लवकर पूर्ण होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ‘अहिंदा’ संघटना पुढेही सक्रिय राहील आणि समाजाचा पाठिंबा मिळाल्यास नेतृत्व उदयास येत राहील, असे स्पष्ट केले. तसेच सिद्धरामय्या हे आमचे नेतेच राहतील, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.




