बेळगाव लाईव्ह: सरदार ग्राउंड येथे आयोजित करण्यात आलेली मर्यादित षटकांची क्रिकेट स्पर्धा केवळ खेळापुरती मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारी ठरली. स्पर्धेत उपविजेते ठरलेल्या कांतारा बॉयज संघाने मिळालेली संपूर्ण बक्षीस रक्कम शांताई वृद्धाश्रमाला देऊन उपस्थितांची मने जिंकली.
स्पर्धेत विविध समाजातील एकूण आठ संघांनी सहभाग नोंदवला होता. अंतिम सामन्यात एसजी स्पोर्ट्स संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कांतारा बॉयज संघावर मात करून विजेतेपद पटकावले. प्रकाश जाधव यांना ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’, तर सचिन साहनी यांना ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
मात्र अंतिम सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण सोहळ्यात कांतारा बॉयज संघाने घेतलेला निर्णय सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला. उपविजेतेपदातून मिळालेली संपूर्ण बक्षीस रक्कम संघाने शांताई वृद्धाश्रमाला सुपूर्द करत समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी अधोरेखित केली. त्यांच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांसह सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

स्पर्धेचे आयोजन गंगाधर पाटील आणि सरदार ग्राउंड प्लेयर्स यांच्या वतीने करण्यात आले होते. बक्षीस वितरण समारंभाला ऐलन मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी गंगाधर पाटील, शरद पाटील, रमेश गोवेकर, इम्तियाज खाझी, राजू तेलगेरी, सुनील नायडू, इकबाल, मोहसीन, अजहर, गणेश आदी उपस्थित होते.
यावेळी बंगळुरू येथे झालेल्या आयसीएन इंडिया राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवणारे हेमंत अनिल शंभुचे यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांनी Men’s Physique गटात सुवर्णपदक आणि Men’s Fitness गटात रौप्यपदक पटकावून बेलगावचा गौरव वाढवला आहे.
क्रिकेट स्पर्धेत विजय-पराजय होतच असतात; मात्र समाजासाठी काहीतरी करण्याची भावना अधिक महत्त्वाची असते, हे कांतारा बॉयज संघाने आपल्या कृतीतून दाखवून दिले. त्यामुळे ही स्पर्धा क्रीडा स्पर्धेपेक्षा सामाजिक जाणीव जागृत करणारा उपक्रम म्हणून अधिक स्मरणात राहणार आहे.




