बेळगाव लाईव्ह: रस्ते अपघातांमुळे होणारे मृत्यू आणि गंभीर जखमींचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने बेळगाव पोलीस आयुक्तालयातर्फे हेल्मेट जनजागृती सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. शहरातील कित्तूर राणी चन्नम्मा चौक येथे आयोजित कार्यक्रमात उत्तर विभागाचे आयजीपी संदीप पाटील आणि पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या उपस्थितीत जनजागृती मोहिमेचा शुभारंभ झाला.
यावेळी बोलताना आयजीपी संदीप पाटील यांनी उत्तर विभागात दरवर्षी सुमारे दोन हजार नागरिकांचा रस्ते अपघातांमध्ये बळी जात असल्याची धक्कादायक माहिती दिली. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी शासन आणि पोलीस विभागाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असून नागरिकांनीही वाहतूक नियमांचे पालन करून या मोहिमेला सहकार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी वाहनचालकांना हेल्मेट वापरण्याचे महत्त्व पटवून देत जनजागृती केली. “हेल्मेट परिधान करा, जीव वाचवा” असे संदेश असलेले फलक हातात घेऊन नागरिकांना सुरक्षित वाहनचालना करण्याचे आवाहन करण्यात आले.

रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलीस दलाकडून शहरातील विविध चौक आणि गर्दीच्या ठिकाणी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असून, प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन संदीप पाटील यांनी केले.
वाहतूक नियमांचे काटेकोर पालन आणि हेल्मेटचा नियमित वापर यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे या जनजागृती अभियानाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.




