बेळगाव लाईव्ह :कर्नाटकमध्ये सत्तेवर आल्यानंतर अवघ्या 24 तासात मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारमध्ये नाराजीचा स्फोट झाला असून राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामलिंगा रेड्डी यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
काँग्रेस मधील प्रभावी आणि वरिष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे रामलिंगा रेड्डी हे नव्या मंत्रिमंडळात बेंगळूर नागरी विकास खात्यासाठी इच्छुक होते, मात्र त्यांना ते खाते न देता जलसंपदा खाते देण्यात आले आहे. त्यामुळे नाराज झालेल्या रामलिंगा रेड्डी यांनी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन दिलेल्या मंत्रीपदाचा राजीनामा सादर केला आहे.
यापूर्वी सिद्धरामय्या सरकार स्थापन होत असताना काँग्रेस हाय कमांडने रामलिंगा रेड्डी यांना बेंगलोर नागरी विकास खाते देण्याचा विचार केला होता मात्र त्यावेळी उपमुख्यमंत्री असलेल्या डी. के. शिवकुमार यांनी त्यांची समजूत काढत हे खाते स्वतःकडे ठेवले होते. “भविष्यात आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर हे खाते रेड्डी यांना देऊ,” असे आश्वासन मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी त्यावेळी दिल्याचे कळते.

बेंगलोर नागरी विकास खाते न देता जलसंपदा खाते देऊ केल्यामुळे रामलिंगा रेड्डी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून “मला मंत्रिपदाची गरज नाही पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करेन,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजू) शेठ यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना रामलिंगा रेड्डी आपला राजीनामा मागे घेतील असा विश्वास व्यक्त केला आहे.




