बेळगाव लाईव्ह : सीमाप्रश्नाला गती मिळावी तसेच सीमाभागातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या कथित अन्यायाची केंद्र सरकारने तातडीने दखल घ्यावी, या मागणीसाठी पुणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन निवेदन सादर केले.
खानापूर- बेळगाव परिसरातून पुण्यात स्थायिक झालेल्या नागरिकांनी सीमावासीयांवरील कथित भाषिक अन्याय, मराठी भाषेची गळचेपी, मराठी भाषिकांवर दाखल होणारे गुन्हे आणि सीमाप्रश्नावरील सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणाला गती मिळावी, यासाठी सह्यांच्या मोहिमेलाही पाठिंबा दर्शविला आहे.
निवेदनात केंद्र सरकारने सीमाप्रश्नात तातडीने हस्तक्षेप करावा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर हा प्रश्न प्रभावीपणे मांडावा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी सीमाप्रश्नाची माहिती असल्याचे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सीमावासीयांवरील कथित अन्यायाबाबत तातडीने पत्र लिहिणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या विषयात त्वरित दखल घेण्याची विनंती करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनीही महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करून त्यावर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी हेमंत हिंदुराव शिंदे, गणपती पाटील, सातेरी पाटील, विश्वनाथ पाखरे, वैराळ सुळकर, गंगाराम वीर, परशुराम पाखरे, राजकीरण गाडेकर, प्रशांत बावकर, युवराज रोखडे यांच्यासह पुणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




