बेळगाव लाईव्ह : शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने रविवार, दि. २८ जून रोजी सकाळी १०.३० वाजता मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहात काव्य लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ शिक्षणप्रेमी सुभाष ओऊळकर यांच्या हस्ते होणार असून, समकालीन मराठीतील ज्येष्ठ कवी अजय कांडर तसेच कवी, पत्रकार विजय चोरमारे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यशाळेत कविता म्हणजे काय, कवितेचे स्वरूप व विविध प्रकार, मराठी कवितेचा प्रवास, आधुनिक मराठी कविता, कवितेची निर्मिती प्रक्रिया, चांगल्या कवितेची वैशिष्ट्ये, प्रभावी कविता लेखन, प्रात्यक्षिक, प्रश्नोत्तरे, शंका निरसन आणि खुली चर्चा अशा विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.
अजय कांडर हे समकालीन मराठी कवितेतील महत्त्वाचे कवी असून त्यांच्या आवानओल, हत्ती इलो, युगानुयुगे तूच आणि अजूनही जिवंत आहे गांधी या कवितासंग्रहांना मोठी लोकप्रियता मिळाली आहे. महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

विजय चोरमारे यांनी १९८७ पासून पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. पापण्यांच्या प्रदेशात, शहर मातीच्या शोधात, आतबाहेर सर्वत्र आणि स्तंभसूक्त हे त्यांचे कवितासंग्रह विशेष गाजले असून पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनाही अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
कविता लेखनाची आवड असलेले नवोदित कवी, साहित्य अभ्यासक, विद्यार्थी तसेच रसिकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




