बेळगाव लाईव्ह : कावळेवाडी येथील चव्हाट गल्ली परिसरात भाऊबंदकीच्या जमीन वाटपाच्या वादातून झालेल्या मारहाण प्रकरणात दुसरे जेएमएफसी न्यायालयाने पाच आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
प्रकरणातील फिर्यादी लक्ष्मी यशवंत बुरुड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या पती यशवंत बुरुड तसेच भाऊ राजाराम व यल्लाप्पा बुरुड यांच्यात शेती व घराच्या वाटणीवरून दीर्घकाळ वाद सुरू होता. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, इतर भावांकडे अधिक जमीन असून आपल्याला कमी जमीन मिळाल्याने त्यांच्यात वारंवार वाद होत होते.
तक्रारीनुसार, 28 फेब्रुवारी 2015 रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास लक्ष्मी बुरुड या घरासमोर काम करत असताना आरोपींनी जमिनीच्या वादातून त्यांच्याशी भांडण काढले. त्यांना शिवीगाळ करून जवळ पडलेल्या लाकडी टोण्याने डोक्यावर व शरीरावर मारहाण केल्याचा आरोप होता. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या त्यांच्या पती यशवंत यांनाही मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. तसेच आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला होता.
या घटनेनंतर दोघांनाही उपचारासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 143, 147, 148, 354, 324, 504, 506 सह 149 अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास पूर्ण केल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.
मात्र, खटल्याच्या सुनावणीदरम्यान फिर्यादी व प्रत्यक्ष साक्षीदारांच्या जबाबांमध्ये आढळलेल्या विसंगतींच्या आधारे न्यायालयाने आरोपींविरुद्धचा आरोप सिद्ध होत नसल्याचे नमूद करत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
निर्दोष मुक्तता मिळालेल्या आरोपींमध्ये राजाराम नागाप्पा बुरुड, यल्लाप्पा नागाप्पा बुरुड, लक्ष्मी यल्लाप्पा बुरुड, लता राजाराम बुरुड आणि शटुली नागाप्पा बुरुड (सर्व रा. चव्हाट गल्ली, कावळेवाडी) यांचा समावेश आहे.
या प्रकरणात आरोपींच्या वतीने वकील. शामसुंदर पत्तार, वकील. हेमराज बेंचनणावर आणि वकील मारुती कामाणाचे यांनी काम पाहिले.




