बेळगाव लाईव्ह ::नीट परीक्षेसह देशातील केंद्रीय परीक्षांच्या पेपर फुटीला भाजप सरकारच जबाबदार असून याच्या निषेधार्थ आणि जनजागृतीसाठी काँग्रेस पक्षातर्फे येत्या 9 ऑगस्ट 2026 पर्यंत चाळीस दिवसांचे ‘छात्रों की गुंज’ नामक देशव्यापी विद्यार्थी आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सचिव आणि कर्नाटकचे प्रभारी गोपीनाथ यांनी दिली.
बेळगाव शहरात आज सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. गोपीनाथ म्हणाले की, गेल्या दहा वर्षात किमान 89 केंद्रीय परीक्षांचे पेपर फुटले आहेत. ही बाब केंद्रातील भाजप सरकारचे शैक्षणिक क्षेत्रातील संपूर्ण अपयश दर्शवते. पेपर फुटीचे हे प्रकरण साधे नसून हा मोठा घोटाळा आहे. ज्याचा मोठ्या आर्थिक व्यवहाराशी संबंध आहे आणि ही बाब आम्ही जनतेसमोर करणार आहोत. पेपर फुटीच्या घोटाळ्याला भाजप सरकार कारणीभूत आहे तथापि त्यांच्याकडून शिक्षण खात्याचे अधिकारी पेपर छपाई प्रक्रिया वाहतूक प्रक्रिया वगैरे गोष्टींना दोष दिला जात आहे मात्र यात काही तथ्य नको नसून हा एक मोठा घोटाळा स्कॅम आहेे.
यासाठी आमचे नेते राहुल गांधी, काँग्रेस पक्षाने भाजप आणि जनतेसमोर तीन विनंत्या मांडल्या आहेत. पेपर फुटीचे हे प्रकरण सर्वांनी गांभीर्याने घेतले पाहिजे कारण आपल्या देशातील मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. यासाठीच काँग्रेसची पहिली विनंती आहे की केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी ताबडतोब आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि दुसरी विनंती त्यांच्यावर कारवाई केली जावी. तिसरी विनंती वर्षभरातील केंद्रीय परीक्षा आणि भरती प्रक्रिया यांचे पूर्वनियोजित वार्षिक वेळापत्रक जाहीर केले जावे. पेपर फुटीच्या प्रकारामुळे देशभरात 23 मुलांनी आपला जीव गमावला आहे ही अत्यंत दुर्दैवी, दुःखाची गोष्ट आहे.

याला भाजप सरकार जबाबदार आहे; मोदी सरकारने याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे. शिक्षण मंत्र्यांसह संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे मात्र मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्यावर फक्त खाते बदलाची कारवाई केली जात आहे हे काँग्रेस पक्षाला कदापि मान्य नाही संबंधितांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.
कारण ही फक्त पेपर फुटी नाही तर हा एक फार मोठा आर्थिक घोटाळा आहे असे स्पष्ट करून पेपर फुटी आणि एकंदर घोटाळ्यासंदर्भात युवा काँग्रेसकडून देशभरात गावोगावी एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार असल्याचे गोपीनाथ यांनी शेवटी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेस बेळगाव जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजू) सेठ, चिक्कोडी जिल्हा काँग्रेस व बुडाचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे,
केपीसीसी पदाधिकारी सुनील हनमण्णावर यांच्यासह काँग्रेसचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.




