बेळगाव लाईव्ह :बेळगावमधील सुवर्ण विधान सौध येथे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन घेण्याचा कर्नाटक सरकारचा पूर्वीचा प्रस्ताव बारगळल्याचे दिसून येत आहे; कारण तयारी सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला अद्याप कोणतीही अधिकृत सूचना मिळालेली नाही.
जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात बेळगावमध्ये अधिवेशन घेण्याचा जो निर्णय पूर्वी घेण्यात आला होता, त्यावर आता कोणतीही कार्यवाही केली जात नाही.
विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी ज्या व्यवस्थांची तयारी बऱ्याच आधी सुरू केली जाते, त्याबाबत राज्य सरकारकडून कोणताही संदेश किंवा सूचना न मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. सुवर्ण विधानसौध येथे अधिवेशन होणार असल्याच्या पूर्वीच्या संकेतानुसार बेळगाव जिल्हा प्रशासनाने प्राथमिक नियोजनास सुरुवात केली होती. लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी आणि अभ्यागत यांच्यासाठी निवास, सुरक्षा, वाहतूक आणि इतर आवश्यक व्यवस्थांचे नियोजन करण्यासाठी सुरुवातीच्या बैठकाही घेण्यात आल्या होत्या.
सूत्रांच्या माहितीनुसार, नियोजनातील या बदलाचा संबंध राज्य सरकारचे सध्या मंत्रिमंडळ विस्तार आणि त्याशी संबंधित राजकीय प्राधान्यक्रमांवर असलेल्या लक्ष्याशी असू शकतो. या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित केले जात असल्याने, आता मान्सून अर्थात पावसाळी अधिवेशन बेंगलोर मध्येच होण्याची शक्यता आहे.
विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी बेळगावमध्ये अधिवेशन घेण्यास जाहीर पाठिंबा दर्शवल्यानंतर या प्रस्तावाला अधिक चालना मिळाली होती. अधिवेशनासंदर्भात बोलताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बेळगावमध्ये पावसाळी अधिवेशन घेण्याबाबत जिल्हा प्रशासनाला राज्य सरकारकडून अद्याप कोणतेही निर्देश मिळालेले नसल्याचे स्पष्ट केले आहे.




