बेळगाव लाईव्ह :कांही उपवनसंरक्षक (डीसीएफ), सहायक वनसंरक्षक (एसीएफ) आणि परिक्षेत्र वन अधिकारी (आरएफओ) यांच्या बेळगाव वन वलयात अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या बदल्यांमुळे पर्यावरणवादी आणि जनतेमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
बेळगाव, घटप्रभा (गोकाक), बागलकोट आणि विजयपुरा या प्रादेशिक वन विभागांसह सामाजिक वनीकरण विभागांचा समावेश असलेले बेळगाव वन वलय (फॉरेस्ट सर्कल) हे कर्नाटकातील सर्वात प्रतिष्ठित आणि उच्च-अर्थसंकल्पीय वन वलयांपैकी एक मानले जाते.
पश्चिम घाटाच्या घनदाट विस्तीर्ण प्रदेशापासून ते शुष्क झुडपी जंगलांपर्यंत पसरलेल्या या वलयाला विविध सरकारी योजनांअंतर्गत दरवर्षी कोट्यवधी रुपये मिळत असल्यामुळे येथील महत्त्वाच्या पदांना मोठी मागणी असते. त्याचमुळे की काय तर, दर दोन ते तीन वर्षातून एकदा होणाऱ्या बदली प्रक्रियेत येथील कांही अधिकाऱ्यांच्या बदल्या याच वलयातील शेजारील परिक्षेत्र आणि उपविभागांमध्येच करण्यात आल्या आहे.
रामदुर्ग येथे एसीएफ वसीम तेनगी आणि आरएफओ भाग्यश्री मसळी यांना त्यांच्या सध्याच्या पदावर रुजू होऊन जवळपास 3 वर्षे झाली असली तरी त्यांची अद्याप बदली झालेली नाही. त्याचप्रमाणे रायबाग उपविभागात एसीएफ म्हणून कार्यरत असलेल्या सुनीता निंबरगी यांची मार्च 2024 मध्ये खानापूर येथे बदली झाली होती आणि त्यांनी तेथे पुढील बदली न होताच 2 वर्षे पूर्ण केली आहेत.

बेळगाव वनवलयाचे मुख्य वनसंरक्षक (सीसीएफ) म्हणून 4 वर्षे कायम राहिलेल्या मंजुनाथ चव्हाण यांच्या कार्यकाळाकडेही लक्ष वेधले गेले आहे. चव्हाण यांनी 2022 मध्ये पदभार स्वीकारला आणि तेंव्हापासून ते त्याच पदावर आहेत.
गेल्या 3 वर्षांपासून बेळगाव वन वलय अनेक वादांमुळे चर्चेत असून या वलयात ठराविक अधिकाऱ्यांच्या दीर्घकाळ चाललेल्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वादग्रस्त प्रकरणांमध्ये बेळगाव प्राणीसंग्रहालयातील 32 काळवीटांचा मृत्यू, नागरगाळी येथे विजेचा धक्का लागून दोन हत्तींचा मृत्यू, सौर ऊर्जा प्रकल्पासाठी बडाल अंकलगीजवळ बेकायदेशीर वृक्षतोडीचे आरोप, तळेवाडी गाव पुनर्वसन प्रकल्पांतर्गत नुकसान भरपाई देण्यातील कथित गैरप्रकार, निविदांशिवाय कोट्यवधी रुपये खर्च करून वन कार्यालये आणि अतिथीगृहांची नूतनीकरणाची कामे, वन कायद्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या पवन ऊर्जा कंपनीकडून सीएसआर निधीतून वाहनांची खरेदी आणि भीमगड वन्यजीव अभयारण्यातील प्रवेशद्वाराच्या कमानीच्या निकृष्ट बांधकामाचा आरोप यांचा समावेश आहे.
यासंदर्भात बोलताना वन्यजीव संरक्षक गिरीधर कुलकर्णी यांनी एखाद्या अधिकाऱ्याची एकाच ठिकाणी दीर्घकाळासाठी सतत नेमणूक करणे ही एक चांगली प्रशासकीय पद्धत नाही. “अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली पारदर्शक प्रणालीद्वारे केली पाहिजे, जेणेकरून उत्तरदायित्व आणि जनतेचा विश्वास टिकून राहील,” असे मत व्यक्त केले.




