belgaum

सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात तातडीने सुनावणी घेण्यासाठी अर्ज करणार

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव येथील मराठा मंदिरात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वाची आढावा बैठक नुकतीच पार पडली. मुंबईत महाराष्ट्र सरकारच्या उच्चाधिकार समितीसोबत नुकतीच जी बैठक झाली, त्या बैठकीचा आढावा घेण्यासाठी आणि तिथल्या सकारात्मक निर्णयांवर पुढील रणनीती आखण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थित नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मुंबईतील घडामोडींवर सविस्तर विचारमंथन केले.

गेल्या ५ ते ६ वर्षांपासून प्रलंबित असलेली उच्चाधिकार समितीची बैठक व्हावी यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती गेल्या दीड वर्षांपासून सातत्याने प्रयत्नशील होती. ही बैठक नुकतीच मुंबईत संपन्न झाली असून, यामध्ये समितीच्या वतीने सीमाप्रश्नासंदर्भात महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले, अशी माहिती मध्यवर्ती अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी दिली. मुंबईतील बैठकीत अनेक सकारात्मक विषयांवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीत सीमाभागातील ४० लाख मराठी जनतेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नाची तातडीने आणि सलग सुनावणी व्हावी, अशी मागणी करण्यात आली. या मागणीसाठी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अधिकृत अर्ज दाखल करावा, अशी विनंती समितीने केली असून महाराष्ट्र सरकारने यासाठी आपली सकारात्मक तयारी दर्शवली आहे.

 belgaum

सीमाभागातील मराठी जनतेला भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे सर्व नियम आणि हक्क मिळावेत, यासाठी महाराष्ट्राच्या सर्व खासदारांनी आगामी लोकसभा अधिवेशनात हा प्रश्न मांडावा किंवा राष्ट्रपतींची भेट घेऊन अंमलबजावणीची विनंती करावी, अशी दुसरी प्रमुख मागणी करण्यात आली. याशिवाय, कर्नाटक सरकारकडून होणाऱ्या भाषिक अत्याचाराचा निषेध करत, मराठी पाट्या आणि बॅनरवर अन्याय करू नये यासाठी महाराष्ट्र सरकारने कर्नाटक सरकारला अधिकृत पत्र लिहावे, अशीही भूमिका मांडण्यात आली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी १४ डिसेंबर २०२२ रोजी दोन्ही राज्यांच्या प्रत्येकी ३ मंत्री आणि आयएएस अधिकाऱ्यांची जी समिती नेमली होती, तिची बैठक चालू अधिवेशनातच घेऊन सीमाभागातील अडचणी सोडवाव्यात, अशी मागणीही करण्यात आली. या मंत्र्यांच्या बैठकीसोबतच समितीच्या पदाधिकाऱ्यांची गृहमंत्र्यांसोबत बैठक घडवून आणण्याची विनंती महाराष्ट्र सरकारला करण्यात आली असून, सरकारने याचा आपल्या प्रसिद्धीपत्रकात समावेश केला आहे.

मुंबईतील उच्चाधिकार समितीच्या बैठकीत नेमके काय घडले, याची सविस्तर माहिती बैठकीत उपस्थित नेत्यांनी इतर सदस्यांना दिली. या वेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील, आणि तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष व माजी आमदार मनोहर किणेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि नेत्यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच उपस्थित कार्यकर्त्यांनीही या वेळी आपली मते मांडली.

या बैठकीला ॲड. महेश बिर्जे, विकास कलघटगी, गोपाळ पाटील, गोपाळ देसाई, एम. जी. पाटील, बी. डी. मोहनगेकर, आर. सी. पाटील, एम. बी. गुरव, लक्ष्मण पाटील, अजित पाटील, रावजी पाटील, आर. के. पाटील आणि मनोहर हुंदरे यांच्यासह शहर म. ए. समिती व मध्यवर्ती म. ए. समितीचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.