बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील सिग्नलच्या ठिकाणी भर उन्हात थांबणाऱ्या वाहन चालकांना ‘ग्रीन शेड’ उभारून प्रशासनाने दिलासा दिला ही स्वागतार्ह बाब आहे. तथापि अशा तात्पुरत्या सावलीची सोय करण्याबरोबरच प्रशासनाने शहरातील उजाड होत चाललेल्या रस्त्यांवर वृक्ष लागवड करून भविष्यात हरित क्रांती घडवण्याद्वारे उन्हाच्या तडाख्यावर मात करणारी शाश्वत सावली निर्माण करावी, अशी विनंती शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांनी बेळगाव जिल्हा प्रशासन व महापालिकेला केली आहे.
यंदा उष्णतेची लाट दिवसेंदिवस वाढत असून दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत उन्हाच्या झळा असह्य बनत आहेत. प्रशासनाने याची दखल घेत सिग्नलच्या ठिकाणी उन्हात थांबणाऱ्या वाहन चालकांना दिलासा देताना त्या ठिकाणी ग्रीन शेड उभारण्याचे काम सुरू केले आहे. सध्या शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा चौकात हे शेड उभारण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांनी एका जाहीर व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला उपरोक्त विनंती केली आहे.
शहरातील राणी कित्तूर चनम्मा सर्कल येथील सिग्नलच्या ठिकाणी वाहनचालकांचे उन्हापासून संरक्षण होण्यासाठी ग्रीन शेड उभारल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे आभार मानून अनगोळकर म्हणाले की, एकंदर परिस्थिती पाहता येत्या वाढत चाललेल्या उष्म्यामुळे येत्या 10 वर्षानंतर शहरात सर्वत्र असे ग्रीन शेड उभारण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.
याचा गांभीर्याने विचार करून बेळगाव जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेने सुलभ रहदारीसाठी जसे रस्त्यांचे रुंदीकरण केले आहे, तसेच त्या रस्त्यांशेजारी बेळगावातील पारंपारिक वृक्षांची लागवड करावी. ज्यामुळे आपल्या पुढील पिढीला तात्पुरता नाही तर कायमस्वरूपी शाश्वत सावलीचा रस्ता उपलब्ध होईल.

जसे पूर्वी 20 -25 वर्षांपूर्वी मुबलक प्रमाणात असलेल्या झाडांच्या सावलीमुळे बेळगाव शहरात कोठेही फिरताना उन्हाची झळ लागत नव्हती. हाच अनुभव वृक्षारोपण केल्यास पुढील 10 वर्षानंतर येईल. सध्याच्या ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटावर देखील हा एक चांगला पर्याय असेल. तरी प्रशासनाने रस्त्याशेजारी वृक्ष लागवडीचा गांभीर्याने विचार करून संपूर्ण देशासाठी एक चांगला आदर्श घालून द्यावा. त्यासाठी बेळगाव शहरातील रस्त्यांशेजारी 10 फुटाच्या अंतरावर येथील पारंपारिक वृक्षांचे रोपण आणि संवर्धन करून हरितक्रांती घडवावी, अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांनी केली आहे.
त्याचप्रमाणे उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन ट्रॅफिक सिग्नलच्या ठिकाणी रहदारी पोलीस आणि नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी जी सूचना करण्यात आली आहे, जनहितार्थ त्या सूचनेची पूर्तता येत्या दोन दिवसात आमच्याकडून केली जाईल, अशी ग्वाही देखील अनगोळकर यांनी दिली.




