बेळगाव लाईव्ह : “मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जर आपल्या पदाचा राजीनामा दिला, तर राज्यातील काँग्रेस सरकार कोसळणे निश्चित आहे,” असा खळबळजनक दावा विधान परिषद सदस्य लखन जारकीहोळी यांनी केला आहे. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक शहरात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवरून काँग्रेस हायकमांडवर जोरदार निशाणा साधला.
लखन जारकीहोळी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना म्हटले की, “गेल्या तीन वर्षांत सिद्धरामय्या यांनी राज्याची आर्थिक परिस्थिती कोणत्याही अडचणीशिवाय अतिशय सक्षमपणे हाताळली आहे. अशा महान नेत्यावर अन्याय करून जर हायकमांडने मुख्यमंत्री बदलण्याचा प्रयत्न केला, तर सरकार कोसळण्यात शंका नाही. सिद्धरामय्यांचा राजीनामा निश्चित झाल्यास, काँग्रेस सरकारने लागू केलेल्या लोकप्रिय ‘गॅरंटी’ योजना अत्यंत लवकर बंद होतील. एवढेच नव्हे तर सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासही गंभीर समस्या निर्माण होईल.”
काँग्रेस हायकमांडवर तीव्र शब्दांत टीका करताना जारकीहोळी यांनी भूतकाळातील राजकीय इतिहासाची आठवण करून दिली. “पूर्वी जेव्हा वीरेंद्र पाटील मुख्यमंत्री होते, तेव्हा काँग्रेस हायकमांडने त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडून लिंगायत समाजावर अन्याय केला होता. आज तीच काँग्रेस हायकमांड कुरुबा समाजाचे मोठे नेते सिद्धरामय्या यांना राजीनामा देण्यास सांगून संपूर्ण कुरुबा समाजावर अन्याय करत आहे. हायकमांडची हीच भूमिका राहिल्यास, आगामी २०२८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष फक्त ४० जागांवर येऊन थांबला तर आश्चर्य वाटायला नको,” असा जाहीर इशारा त्यांनी दिला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल आणि कर्नाटक काँग्रेसचे प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांच्यावर जारकीहोळी यांनी सडकून टीका केली. “या दोन्ही नेत्यांना कन्नड बोलता येत नाही. बेंगळुरू सोडले तर त्यांना कर्नाटकातील एकही गाव माहिती नाही. असे लोक हायकमांडमध्ये बसून, कर्नाटकचा कानाकोपरा माहिती असलेल्या सिद्धरामय्या यांना मार्ग दाखवायला निघाले आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.

राज्यात सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली सरकार अतिशय सुरळीत आणि स्थिर सुरू होते. सर्व नेत्यांना कोणत्या ना कोणत्या पदावर सामावून घेऊन सरकार मजबूत ठेवण्यात आले होते. मात्र, आता हायकमांडने मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय घेऊन सुस्थितीत असलेल्या ‘मधमाशांच्या पोळ्याला हात घालण्याचे’ काम केले आहे, असा आरोप त्यांनी केला.
“सिद्धरामय्या आज मुख्यमंत्री आहेत ते केवळ राजकीय समीकरणांमुळे नाही, तर त्यांच्या पाठीशी ‘अहिंद’ (अल्पसंख्याक, मागासवर्गीय, दलित) आणि कुरुबा समाजाची मोठी शक्ती आहे. आता या मागास घटकांना डावलून सरकार चालवू पाहणारी हायकमांडची भूमिका अत्यंत चुकीची आहे. काँग्रेस हायकमांड आज ‘अहिंद’ समाजाच्या डोळ्यात अश्रू आणत आहे. हा जनतेचा संताप २०२८ च्या निवडणुकीत ज्वालामुखीसारखा भडकेल यात शंका नाही,” असा दावा लखन जारकीहोळी यांनी केला.



