बेळगाव लाईव्ह:बेळगाव शहरातील कपिलेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या कपिलेश्वर तलाव परिसरात रविवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. येथील विहिरीची भिंत अचानक कोसळल्याने दोघेजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सकाळच्या सुमारास काही युवक विहिरीत पोहण्यासाठी गेले होते. याच दरम्यान विहिरीची भिंत अचानक कोसळली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून दोन मुले आत अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशामक दल व बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

दरम्यान, मे महिन्यातील उष्णतेमुळे या विहिरीत पोहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत असते. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने येथे नेहमीपेक्षा अधिक युवक उपस्थित होते, विहिरीत अडकलेले दोघेही शहापूर भागातील असल्याचीही शक्यता आहे अशी माहिती स्थानिकांनी दिली.
घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, अधिक तपास सुरू आहे दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले तर असून विहिरीतील पाणी काढले जात आहे नेमके किती जण बुडाले? याचा शोध घेतला जात आहे.




