बेळगाव लाईव्ह : अथणी तालुक्यातील सावदी गावातील एका शेतकरी पुत्राने आपल्या जिद्द, मेहनत आणि स्वअभ्यासाच्या बळावर देशभरात मानाचा तुरा रोवला आहे.
सवदी गावचे बसवराज धारेप्पा केंपवाड यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) प्रतिष्ठित इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस (IFS) परीक्षेत अखिल भारतीय प्रथम क्रमांक मिळवत बेळगाव जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे.
शुक्रवारी निकाल जाहीर होताच सावदी गावात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. गावकरी, नातेवाईक आणि मित्रपरिवाराने बसवराज यांच्या घरी गर्दी करत मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाने देशात अव्वल क्रमांक पटकावल्याने संपूर्ण परिसरातून अभिमान व्यक्त केला जात आहे.
बसवराज यांनी प्राथमिक शिक्षण सावदी गावात पूर्ण केले. त्यानंतर अथणी येथे पुढील शिक्षण घेत त्यांनी सिरसी येथे पदवी शिक्षण पूर्ण केले. पुढे बेंगळुरूमध्ये राहून त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली.
विशेष म्हणजे, कोणत्याही कोचिंग क्लासचा आधार न घेता केवळ स्वअभ्यास आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी दुसऱ्याच प्रयत्नात हे दैदिप्यमान यश मिळवले.
“ग्रामीण भागातून आणि मोरारजी शाळेतून शिक्षण घेत आज या टप्प्यावर पोहोचल्याचा अभिमान वाटतो. जिद्द असेल तर गरीबी कधीच आड येत नाही,” अशी भावना बसवराज यांनी व्यक्त केली.
त्यांचे वडील धारेप्पा केंपवाड यांनी मुलाच्या यशामागील संघर्ष उलगडताना सांगितले,
“आम्ही छोटं शेतकरी कुटुंब. आर्थिक अडचणी होत्या, पण मुलांच्या शिक्षणात कधी तडजोड केली नाही. शेती भाड्याने घेऊन मेहनत करत त्यांना शिकवलं. आज बसवराजने मिळवलेलं यश हे आमच्या गावासाठी अभिमानाचा क्षण आहे.”
सावदी गावातील शेतकरी पुत्राने मिळवलेल्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नवा आदर्श निर्माण झाला असून सर्व स्तरांतून बसवराज यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




