बेळगाव लाईव्ह : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) इंजिनिअर सेलचे प्रदेशाध्यक्ष अमित देसाई यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेऊन आयटी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील वाढत्या नोकरकपातीच्या गंभीर प्रश्नावर सविस्तर चर्चा केली.
यावेळी अमित देसाई यांनी शरद पवार यांना निवेदन सादर करत देशातील आयटी आणि कॉर्पोरेट क्षेत्रात सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील अचानक कर्मचाऱ्यांच्या कपातीमुळे हजारो कुटुंबांवर आर्थिक व मानसिक संकट ओढवल्याचे सांगितले. सध्याच्या मंदावलेल्या रोजगार बाजारामुळे नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना पर्यायी रोजगार मिळणे अत्यंत कठीण बनल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केंद्र सरकारकडे अशी मागणी करून सदर समस्या तातडीने सोडवावी अशी मागणी देसाई यांनी यावेळी केली.
निवेदनात केंद्र सरकारने कंपन्यांकडून कामगार कायद्यांचे काटेकोर पालन करून घ्यावे, कोणत्याही कर्मचाऱ्याला योग्य नोटीस व कायदेशीर नुकसानभरपाईशिवाय कामावरून कमी करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सेवासमाप्तीवेळी दिल्या जाणाऱ्या सेवरन्स पॅकेजवर पूर्ण करमाफी देण्याची मागणीही करण्यात आली.

“आयटी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचारी हे देशातील प्रामाणिक करदाते असून अचानक निर्माण झालेल्या या आर्थिक संकटात सरकारने त्यांना आर्थिक संरक्षण देणे गरजेचे आहे. सेवासमाप्ती पॅकेज करमुक्त केल्यास बेरोजगार कर्मचाऱ्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडण्यास मोठा दिलासा मिळेल,” असे अमित देसाई यांनी निवेदनात नमूद केले आहे.
यासंदर्भात शरद पवार यांनी विषय गांभीर्याने ऐकून घेत केंद्र सरकार व कामगार मंत्रालयाकडे हा प्रश्न मांडण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती देसाई यांनी दिली. यावेळी बेळगावचे विक्रम पाटील देखील उपस्थित होते.



