बेळगाव लाईव्ह : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील गावांमध्ये महापुरुषांची जयंती साजरी करण्यासाठी पोलीस प्रशासनाने वेळ निश्चित करून परवानगी द्यावी, अशी मागणी भाजप ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष युवराज जाधव यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी बेळगाव शहर पोलीस आयुक्तांना लेखी निवेदन सादर करून सविस्तर चर्चा केली.
बेळगाव ग्रामीण मंडळातील सर्व नागरिकांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले आहे. आगामी काळात साजरी होणारी शिवजयंती, बसव जयंती आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यांसारख्या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गावोगावी मिरवणुकीचे आयोजन केले जाते.
या कार्यक्रमांमध्ये सुसूत्रता राहावी यासाठी पोलिसांनी मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात, अशी भूमिका युवराज जाधव यांनी मांडली आहे.

ग्रामीण भागातील प्रत्येक गावामध्ये जयंती उत्सव साजरा करताना वेळेचे बंधन आणि डीजे वापराबाबत स्पष्ट आदेश प्रशासनाने निर्गमित करावेत. यामुळे उत्सवाचा आनंदही लुटता येईल आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होणार नाही, अशी विनंती युवराज जाधव यांनी पोलीस आयुक्तांना केली आहे.
पोलीस प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरच योग्य तो निर्णय घ्यावा, जेणेकरून ग्रामीण भागातील जनतेला आपले सण आणि उत्सव उत्साहात साजरे करता येतील, अशी प्रतिक्रिया युवराज जाधव यांनी व्यक्त केली. याप्रसंगी भाजप ग्रामीण मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




