belgaum

कंग्राळी बी के महालक्ष्मी यात्रा शांतता सभेत काय ठरलं

0
103
 belgaum


बेळगाव लाईव्ह : कंग्राळी बुद्रुक येथील महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या शांतता व आढावा बैठकीत प्रशासनाने यात्रेचे नियोजन अधिक काटेकोरपणे करण्याचा निर्णय घेत अनेक महत्त्वाचे मुद्दे निश्चित केले.

43 वर्षांनंतर होत असलेल्या या मोठ्या धार्मिक सोहळ्यादरम्यान कायदा व सुव्यवस्था, सुविधा आणि व्यवस्थापन यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, प्रांताधिकारी श्रवण कुमार आणि विधान परिषद सदस्य चनराज हट्टीहोळी यांच्या उपस्थितीत शांतता बैठक संपन्न झाली.

बैठकीत सर्वप्रथम कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यावर भर देत अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला. काकती, एपीएमसी आणि माळमारुती पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येणाऱ्या या परिसरात गर्दी लक्षात घेता विशेष पथके तैनात केली जाणार आहेत.

 belgaum


आरोग्य सुविधा 24 तास उपलब्ध ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिका सतत सज्ज ठेवण्यात येणार आहे. तसेच यात्रेदरम्यान कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशामक दलाची गाडी नऊ दिवसांसाठी तैनात ठेवली जाणार आहे.

यात्रेला मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेता बससेवा वाढविणे आणि वाहतूक व्यवस्थापन सुधारण्याचे ठरविण्यात आले. याशिवाय पिण्याच्या पाण्याचा अखंड पुरवठा आणि वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.

विशेष म्हणजे, गावातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी जिल्हाधिकारी निधीतून दोन हायमास्ट दिवे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच विविध विभागांना समन्वय साधून सर्व सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले.
एकूणच, यात्रेदरम्यान कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन, पोलीस आणि ग्रामस्थ यांच्या समन्वयातून सुरक्षित, सुव्यवस्थित आणि सुरळीत यात्रा पार पाडण्याचा ठोस आराखडा या बैठकीत निश्चित करण्यात आला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.