belgaum

मराठा लाईट इन्फंट्रीच्या ‘भैरव’ बटालियनची स्थापना

0
401
 belgaum

बेळगाव लाईव्ह : भारतीय लष्कराच्या सामर्थ्यात आज मोठी भर पडली असून बेळगावमधील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये १६ व्या ‘भैरव’ बटालियनची स्थापना करण्यात आली आहे. आधुनिक सुरक्षा आव्हाने आणि दुर्गम भागातील मोहिमा फत्ते करण्यासाठी ही विशेष तुकडी महत्त्वाची भूमिका बजावेल.

बेळगावमधील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (एमएलआयआरसी) येथे १६ व्या ‘भैरव’ बटालियनचा (मराठा एलआय) स्थापना सोहळा उत्साहात पार पडला.

आजच्या गुंतागुंतीच्या सुरक्षा वातावरणात लष्करी क्षमता अधिक धारदार करण्याच्या उद्देशाने या बटालियनची निर्मिती करण्यात आली आहे. ही विशेष पायदळ तुकडी अतिवेगवान हालचाली, अनुकूल युद्धकौशल्य आणि अचूक स्ट्राइकसाठी ओळखली जाईल. प्रामुख्याने दुर्गम डोंगराळ भाग आणि दहशतवादविरोधी कारवायांमध्ये ही तुकडी प्रभावी कामगिरी करेल.

 belgaum


मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जोयदीप मुखर्जी यांनी ‘भैरव’ बटालियनच्या ओसींकडे बटालियनचा ध्वज सुपूर्द केला. आधुनिक काळातील धोक्यांचा सामना करण्यासाठी अशा हलक्या आणि वेगवान तुकड्यांचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले. भारतीय लष्कराची क्षमता बांधणी आणि सदैव सज्ज राहण्याच्या निर्धाराचा पुनरुच्चार या निमित्ताने करण्यात आला.

‘भैरव’ बटालियनच्या समावेशामुळे भारतीय लष्कराची शक्ती वाढली असून, देशाच्या सन्मानासाठी कोणत्याही आव्हानाला वेगाने आणि अचूकतेने प्रत्युत्तर देण्यास सैन्य सज्ज असल्याचे ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी म्हटले.

मराठा लाईट इन्फंट्रीचा ऐतिहासिक वारसा लाभलेली ही बटालियन रेजिमेंटचे धैर्य, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेचे तत्त्वज्ञान पुढे नेणार आहे. या तुकडीत अत्यंत कडक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या निवडक वीरांचा समावेश करण्यात आला असून, ते कोणत्याही रणांगणावर शौर्य गाजवण्यासाठी सज्ज आहेत. लष्करी परंपरेनुसार पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्याने सैनिकांमध्ये रेजिमेंटबद्दलचा अभिमान आणि एकजुटीची भावना अधिक वृद्धिंगत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.