बेळगाव लाईव्ह : “अंतर्गत आरक्षणाची अंमलबजावणी करून काँग्रेसने दिलेला शब्द पूर्ण केला आहे, मात्र हे यश भाजपला पचवणे कठीण जात आहे,” अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी विरोधकांचा समाचार घेतला. बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी जारकीहोळी म्हणाले की, आरक्षणाच्या या निर्णयाला सर्वच स्तरांतून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मात्र, समाजाचे हित बघण्याऐवजी भाजप केवळ राजकारण करण्यात मग्न आहे. आगामी निवडणुकीत आरक्षणाचा मुद्दा तापवण्याचे भाजपचे मनसुबे काँग्रेसने अत्यंत चपळाईने उधळून लावले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
काँग्रेसमधील अंतर्गत नेतृत्वाच्या चर्चेवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पदाबाबतचा कोणताही निर्णय घेण्याचे सर्व अधिकार हायकमांडकडे आहेत. पक्षश्रेष्ठी योग्य वेळी योग्य तो निकाल घेतील आणि सध्या असलेला सर्व संभ्रम संपुष्टात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सत्तेत वाटा मागण्यावरून सुरू असलेल्या वादावर जारकीहोळी यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “पक्षासाठी जमिनीवर उतरून काम करणाऱ्या नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी पदांची अपेक्षा करणे यात काहीच गैर नाही. ही एक नैसर्गिक राजकीय प्रक्रिया आहे,” असे समर्थन त्यांनी यावेळी केले.




