Saturday, April 27, 2024

/

समितीच्या रटाळ कार्यपद्धतीची खरडपट्टी!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शहर आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची संयुक्त बैठक शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बोलाविण्यात आली होती. या बैठकीत युवा कार्यकर्त्यांनी नेत्यांना धारेवर धरत खरडपट्टी काढली. अंतर्गत मतभेद, राष्ट्रीय पक्षांची सलगी यामुळे समितीची होत असलेली पीछेहाट अशा बाबी बाजूला सारून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ठोस रणनीती आखण्यात यावी, अशी आग्रही मागणी उपस्थित कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांकडे केली.

माजी महापौर मालोजी अष्टेकर, माजी आमदार मनोहर किणेकर, ऍड. राजाभाऊ पाटील, ऍड. एम. जी. पाटील, रणजित चव्हाण पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी २१ जणांची कमिटी नेमण्याचा निर्णय घेण्यात आला.

या कमिटीत शहर उत्तर आणि दक्षिण विभागातील ११ तर ग्रामीण विभागातील १० सदस्यांची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांनी विविध विचार मांडले. सूचना केल्या. कार्यकर्त्यांचे विचार आणि सूचना ऐकून घेत उमेदवार निवडीसंदर्भात आणखी एक बैठक बोलाविण्याचा निर्णय घेण्यात आला.

 belgaum

यावेळी बोलताना समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी सर्वच समिती नेत्यांना धारेवर धरले. यावेळी बोलताना ते म्हणाले, अलीकडेच महाराष्ट्र एकीकरण समितीची जम्बो कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. परंतु अद्याप अंतर्गत मतभेद बाजूला झालेले दिसून येत नाहीत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची राष्ट्रीय पक्षांसमोर नाचक्की करण्यात येत आहे. समिती नेत्यांची भूमिका राष्ट्रीय पक्षांसमोर अपमानजनक पुढे जात आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वांनी एकजुटीने येऊन काम करणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकीसाठी बेळगाव बाहेरचा उमेदवार न निवडता बेळगावमधील तळागाळातील मराठी भाषिकांशी बांधिलकी ठेवणारा, मराठीवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात कणखर भूमिका मांडणारा प्रामाणिक उमेदवार निवडावा, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय पक्ष हे मराठी भाषिकांसाठी कर्करोगाप्रमाणे असून या पक्षांच्या प्रवाही गेलेल्या नेत्यांनी आलबेल कारभार त्वरित थांबवावा, असा इशाराही त्यांनी दिला.Mes meeting

या बैठकीत उमेदवार निवडीसंदर्भात कार्यकर्त्यांनी व्यापक विचार व्यक्त केले. काही कार्यकर्त्यांनी एकमेव उमेदवार न निवडता बहुसंख्य उमेदवार निवडणुकीसाठी जाहीर करावेत, असे विचार व्यक्त केले. तर काही कार्यकर्त्यांनी एकमेव उमेदवार निवडून समितीची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन केले. समितीमध्ये सुरु असलेल्या आलबेल कारभाराविरोधात युवा कार्यकर्त्यांनी समिती नेते मनोहर किणेकर आणि मालोजी अष्टेकर यांना थेट सवाल करत जाब विचारला. यामुळे बैठकीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून लवकरच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. यामुळे मागील निवडणुकीप्रमाणेच उमेदवार कोण असेल? याची रस्सीखेच पुन्हा एकदा सुरु झाली आहे. राष्ट्रीय पक्षांनी आधीपासूनच फिल्डिंग लावून उमेदवारांची निवड केली होती. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस जवळ येऊनही अद्याप समितीमध्ये बैठकच घेण्यात येत आहेत. यामुळे या निवडणुकीसाठी समितीचा उमेदवार कोण असेल? कसा असेल? आणि केव्हा जाहीर होईल? याबाबतचा सस्पेन्स मात्र अद्यापही कायम आहे. आज झालेल्या बैठकीत युवा नेते, कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नेत्यांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला असून या निवडणुकीत देखील समितीची उमेदवार निवड प्रक्रिया ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ अशी होईल का? असा संशय व्यक्त केला जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.