बेळगाव लाईव्ह:गेल्या नऊ दिवसांपासून शहरासह परिसरात चैतन्य निर्माण करणाऱ्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानतर्फे आयोजित रौप्य महोत्सवी श्री दुर्गामाता दौडची आज मंगळवारी अखेरच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे अपूर्व उत्साहात यशस्वी सांगता झाली. तरुणांना एकवटून त्यांच्यामध्ये देव, देश व धर्म यांचे स्फुल्लिंग चेतविणाऱ्या श्री दुर्गामाता दौडमध्ये आज देखील हजारो युवक -युवती व शिवभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला होता.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या आजच्या शेवटच्या दिवशीच्या श्री दुर्गामाता दौडला शहरातील मारुती गल्ली येथील श्री मारुती मंदिरापासून प्रारंभ झाला. सकाळी मंदिरात आरती व पूजन करून ध्वज चढवून प्रेरणा मंत्र म्हणण्याद्वारे शिवरायांच्या जयजयकारात श्री दुर्गामाता दौड सुरू झाली. दौडच्या अग्रभागी भगवा ध्वज हाती घेतलेला शिवभक्त होता आणि त्याच्या मागोमाग शस्त्रपथक, ध्वजपथक, भगवे फेटेधारी आणि शेकडो शिवभक्त होते. पांढरी वस्त्रे, डोक्यावर पांढरी गांधी टोपी अथवा भगवे फेटे परिधान करून दौडमध्ये सहभागी झालेले धारकरी, युवक युवती आणि शिवभक्तांसह अग्रभागी असलेले अश्वस्वार साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते.
दौडच्या मार्गावर रांगोळ्या रेखाटून तसेच फुलं, पुष्पदलांची उधळण करून दौडचे स्वागत केले जात होते. त्याचप्रमाणे सुहासिनी महिला अग्रभागी असलेल्या ध्वजाचे औक्षण करून दौडचे स्वागत करत होत्या. प्रत्येक मार्गावर उस्फूर्त स्वागत होते असल्यामुळे दौडमध्ये सहभागी झालेल्या शिवप्रेमींचा उत्साह द्विगुणीत होत होता. आजच्या दौंडमध्ये अबालवृद्धांसह तरुणांबरोबरच युवतींचा सहभाग देखील लक्षणीय होता.
मारुती गल्ली येथील श्री मारुती मंदिरापासून सुरू झालेली आजच्या शेवटच्या दिवशीची श्री दुर्गामाता दौड, नरगुंदकर भावे चौक, श्री महालक्ष्मी मंदिर बसवान गल्ली, देशपांडे गल्ली, बसवाण्णा मंदिर, अशोक चौक, रामलिंग खिंड गल्ली, टिळक चौक, लोकमान्य रंगमंदिर रोड, कोनवाळ गल्ली, अनुसुरकर गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, केळकर बाग, समादेवी गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, नार्वेकर गल्ली, शनिवार खुट, काकतीवेस रोड, गणाचारी गल्ली, गवळी गल्ली, गोंधळी गल्ली, कंग्राळ गल्ली, काकती वेस रोड, कंग्राळ गल्ली मागील बाजू, सरदार्स मैदान रोड, कॉलेज रोड, चन्नम्मा सर्कल, काळी आमराई, कॉलेज रोड, गोंधळी गल्ली, समादेवी गल्ली, कॉलेज रोड मार्गे धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे समाप्त झाली. या ठिकाणी पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ यांच्या हस्ते ध्वज उतरवण्याद्वारे श्री दुर्गामाता दौडचा समारोप करण्यात आला.
यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ म्हणाले की, यापूर्वी दोन वेळा मी बेळगावला आलो आहे. मात्र असे अद्भुत दृश्य ज्यामध्ये 5 वर्षाच्या बालकापासून 70 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग आहे. मुली आहेत, कोणी न बोलावता, कोणीही खाण्याचे आमंत्रण न देता सर्वजण स्वयंस्फूर्तीने शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने भल्या सकाळी या दौडमध्ये भाग घेत आहेत. या सर्वांच्या चेहऱ्यावरील तेज व चैतन्यावरून लक्षात येतं की संभाजी भिडे गुरुजींनी किती लाखो शिवाजी निर्माण केले आहेत, जे भारतीय सनातन संस्कृतीचे संरक्षण करून तिला वाचवतील. सर्वात आनंदाची गोष्ट ही की मला सांगण्यात आलं की या उपक्रमासाठी कोणतीही वर्गणी घेतली जात नाही. कोणताही राजकीय पक्ष अथवा राजकीय नेत्याला सहभागी करून घेतले जात नाही. हा खरोखर असा क्षण आहे की ज्याला जनांदोलन म्हटले पाहिजे. एक अद्भुत अलौकिक अशी शक्ती मला आज या दौड मधून पहावयास मिळाली. मला वाटते की बेळगावत या पद्धतीने जे घडत आहे ते महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात घडले पाहिजे. संपूर्ण जगात जो इस्लामी आतंकवाद फैलावत आहे. त्याला रोखण्याचा जालीम उपाय म्हणजे समाजाला त्या आव्हानासाठी सच्चा निष्ठेने सज्ज करणे. भारताच्या कानाकोपऱ्यात हिंदू संघटना आहेत. मोठे मोठे ठेकेदार आहेत. जे 100 वर्षे झाली आपले ठेकेदारीचे दुकान चालवत आहेत. मात्र त्यांनी भारताच्या सनातनी हिंदूंना लोभी, मूर्ख जमावामध्ये बदलून टाकले आहे. त्यांना भित्रे बनवले आहे. कारण त्या ठेकेदारांना आपली दुकाने चालवायची आहेत.
देशात हिंदूंचा बळी गेला तर त्यांचे तोंड उघडत नाही. कधी म्हणतात आम्हा सर्वांचा डीएनए एकच आहे. कधी सांगतात जाती पंडितांनी बनविले आहेत. हिंदूंचेच नेते आहेत जे शुद्ध दलाली करत आहेत. देशात हिंदूंच्या ज्या हत्या होत आहेत, जो नरसंहार होत आहे त्याबद्दल समाजाची जी प्रतिक्रिया यावयास हवी होती ती आली आणि गेल्या 100 वर्षापासून हे ठेकेदार काय करत होते ते उघड झाले. भिडे गुरुजींना मी माझा आदर्श मानतो. त्यामुळे त्यांच्या आदेशावरून मी येथे आलो आहे.
भिडे गुरुजींसारख्या शूरवीरांसोबत उभं राहणं त्यांच्या आदेशाचे पालन करणे ही संधी कांही मोजक्याच लोकांना मिळते. पहाटे 5 वाजता काढण्यात येणारी श्री दुर्गामाता दौड ही अशी एक क्रांती आहे, एक असे मोठे आंदोलन आहे जे मला वाटतं कोणत्या सरकार अथवा संघटनेच्या सांगण्यावरून होत नाही.
कारण यामध्ये लोकस्वयंस्फूर्तीने सहभागी होतात असे सांगून भिडे गुरुजी आणि शिवप्रतिष्ठांनी मला या ठिकाणी बोलावलं हा मी माझा सन्मान समजतो, असे पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ शेवटी म्हणाले. गेले नऊ दिवस युवा पिढीवर धर्मसंस्कार करण्याबरोबरच त्यांना छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची ओळख करून देणारी श्री दुर्गामाता दौड सुरळीत पार पडावी यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान बेळगावच्या पदाधिकाऱ्यांसह पोलीस प्रशासनानेही विशेष परिश्रम घेतले.